आर्थिक संकटात असलेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सनं बोली लावली आहे. कंपनी प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागानेही खरेदीसाठी टाटा सन्सचा प्रस्ताव मिळाल्याचं सांगितलं. आहे. टाटाने लावलेली बोली यशस्वी ठरली तर ६७ वर्षानंतर पुन्हा एकदा मालकी हक्क टाटाकडे जाणार आहे. टाटा समूहाने १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारने १९५३ साली आपल्या ताब्यात घेतली होती. आता एअर इंडियाचा मालकी हक्क मिळाल्यानंतर ४००० डॉमेस्टिक आणि १८०० आंतरराष्ट्री आणि पार्किंगची जागा मिळणार आहे.

“एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी अनेक प्रस्ताव मिळाले आहेत. त्याचबरोबर टाटा सन्सचा प्रस्ताव देखील मिळाला आहे.”, असं ट्वीट डीआयपीएएम सचिव तुहिन कांत पांडे यांनी केलं आहे.

एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया जानेवारी २०२० पासून सुरु झाली होती. मात्र करोना संकटामुळे यात विलंब झाला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने पुन्हा एकदा कंपन्यांना बोली लावण्याचा प्रस्ताव दिला. आज बोली लावण्याचा अखेरचा दिवस होता. २०२० या वर्षात देखील टाटा ग्रुपनं एअर इंडिया खरेदीसाठी प्रस्ताव दिला होता. यापूर्वी २०१७ मध्ये सरकारने एअर इंडियाचा लिलाव सुरु केला होता. मात्र तेव्हा कोणत्याही कंपनी स्वारस्य दाखवलं नव्हतं. २००७ मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलिणीकरण झाल्यानंतर एअर इंडियाला तोटा होण्यास सुरुवात झाली होती. सध्या एअर इंडियावर ६०,०७४ कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र खरेदी करणाऱ्या कंपनीला २३,२८६.५ कोटी द्यावे लागणार आहेत. उर्वरित कर्ज विशेषतः तयार केलेल्या एअर इंडिया अॅसेट होल्डिंग्स लिमिटेडला हस्तांतरित केले जाईल. याचा अर्थ उर्वरित कर्ज सरकारच उचलणार आहे.