विनायक दामोदर सावरकर यांनी १९२३ मध्ये हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती, असे वादग्रस्त विधान काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.

लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले. सावरकरांनीच हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. द्विराष्ट्र सिद्धांतही त्यांनीच मांडला आणि त्यांचेच समर्थक सध्या भारतात सत्तेत आहेत, असे विधान त्यांनी केले. जिना यांचे कौतुक केल्याबद्दल भाजपाने अय्यर यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. मी जिना यांचा उल्लेख कायदे आझम म्हणून केला. त्यावर मला पत्रकार विचारतात तुम्ही जिना यांचे कौतुक कसे काय केले?. मग पाकिस्तानमध्ये राहणारे अनेक जण गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा करतात. मग ते देशभक्त नाहीत का, असा सवाल त्यांनी विचारला.

देशातील ७० टक्के लोकांनी गेल्या निवडणुकीत मोदींना मत दिले नव्हते. तरी देखील मोदी जिंकले कारण जनता एकत्र आली नव्हती. पण आता ७० टक्के लोक मोदींविरोधात एकत्र येतील आणि अराजकतेच्या वातावरणातून देशाची सुटका करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मणिशंकर अय्यर एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त पाकिस्तानमध्ये गेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मणिशंकर यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केले आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मोदींवर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता. यानंतर काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.