अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २२ जानेवारीच्या दिवशी हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. या सोहळ्याला काँग्रेसने येणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांनीही आपण या सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे जे पाच न्यायाधीश होते त्या सगळ्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण धाडण्यात आलं आहे.

राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे पाच न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर अशा पाचही न्यायाधीशांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या पाचजणांनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. ज्यानंतर मंदिर निर्मिताचा मार्ग मोकळा झाला. आता हे पाचही न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राम मंदिर-बाबरी मशीद वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, २.७७ एकरची वादग्रस्त जमीन रामलल्लाचे जन्मस्थान आहे. न्यायालयाने ही जमीन भारत सरकारने नंतर स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने सरकारला उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते जेणेकरून बोर्ड मशीद बांधू शकेल. ६ डिसेंबर १९९२ रोजी एका जमावाने बाबरी मशीद पाडली. यानंतर राम मंदिर आंदोलनाने वेगळे वळण घेतलं होतं.

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देशातील चित्रपट आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ जानेवारीला बालरुपातील रामाच्या मूर्तीची आणि शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या शाळिग्राम मूर्तीचा प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात येणार आहे. हा देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस असणार आहे यात काहीही शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचं भूमीपूजन केलं होतं. आता याच मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.