पीटीआय, वॉशिंग्टन
‘कुठलेही कागदपत्रे नसलेल्या आणि अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांना भारतात वैध मार्गाने परत आणण्यासाठी भारताचे दरवाजे कायमच खुले आहेत,’ असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ‘अमेरिकेतील नेमक्या किती भारतीयांना परत आणता येईल, यासंबंधीची प्रक्रिया सुरू असून, अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही,’ असे जयशंकर म्हणाले.

अमेरिकेत जवळपास पावणेदोन लाख भारतीय कागदपत्रांविना राहत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर म्हणाले, ‘कायद्याने मुक्तसंचार असावा, या भूमिकेला सरकार म्हणून आमचा पाठिंबा आहे. जागतिक स्तरावर भारतीय कौशल्य आणि बुद्धिमत्तेला अधिकाधिक संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. त्याच वेळी बेकायदा पद्धतीने कुणी कुठे जात असेल, तर बेकायदा स्थलांतराला आमचा विरोध आहे. कुठे बेकायदा घडले, तर त्याच्या बरोबरीने आणखी बेकायदा कृत्यांचा जन्म होतो. असे होणे अपेक्षित नाही’

हेही वाचा :Maha Kumbh Mela 2025: १० कोटी भाविकांचे महाकुंभ‘स्नान’

बांगलादेशमधील परिस्थितीवर चर्चा

जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर बांगलादेशमधील सद्यास्थितीवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली. रुबिओ यांच्याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्स यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली. जयशंकर म्हणाले, ‘बांगलादेशमधील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. त्यावर अधिक काही बोलणे योग्य होईल, असे वाटत नाही.’

मेरिकेतील भारतीय वकिलातींवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा या वेळी उपस्थित केला नाही, असे सांगून जयशंकर म्हणाले. ‘असे असले, तरी मला नक्कीच म्हणावेसे वाटेल, की सॅनफ्रान्सिस्को येथील भारताच्या वकिलातीवर झालेला हल्ला हा गंभीर मुद्दा आहे. हल्ल्यासाठी जबाबदार कोण, हे निश्चित व्हायला हवे. हा हल्ला ज्यांनी केला, त्यांना लवकरच पकडले जाईल, अशी अपेक्षा आम्ही ठेवतो.’

हेही वाचा :Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेसह कुठल्याही देशात भारताचा कुठलाही नागरिक बेकायदा पद्धतीने राहत असेल आणि संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक आहे, अशी आमची खात्री झाली, तर वैध मार्गाने त्यांना भारतात परत आणण्यासाठी आपले दरवाजे कायमच खुले आहेत. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री