Ajay Kumar UPSC Chairman : अग्निवीर योजनेचे प्रणेते तथा माजी संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांची आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.अजय कुमार हे आता ऑक्टोबर २०२७ पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. या संदर्भातील अधिसूचना मंगळवारी (१४ मे) रोजी जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी प्रीती सुदान या यूपीएससीच्या अध्यक्षा होत्या, ज्यांचा कार्यकाळ २९ एप्रिल रोजी संपला होता. प्रीती सुदान यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर आता माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
डॉ.अजय कुमार यांचा कार्यकाळ ते यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून सुरू होणार आहे. तसेच आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो किंवा ते ६५ वर्षांचे होईपर्यंत असतो. दरम्यान, १९८५ च्या केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले डॉ.अजय कुमार हे २०२२ मध्ये संरक्षण सचिव म्हणून निवृत्त झाले होते. आता त्यांचा यूपीएससी अध्यक्षपदाचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२७ पर्यंत असेल.
डीओपीटीने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, “भारतीय संविधानाच्या कलम ३१६ (१) अंतर्गत (जे लोकसेवा आयोगांच्या सदस्यांसाठी नियुक्ती प्रक्रिया स्पष्ट करते) डॉ.अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोग चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद होत आहे.”
अजय कुमार हे संरक्षण सचिव असताना केंद्र सरकारने २०२० मध्ये संरक्षण प्रमुख पद निर्माण केले आणि २०२२ मध्ये अग्निवीर योजना सुरू केली होती. माहितीनुसार, अजय कुमार यांनी संरक्षण मंत्रालयात येण्यापूर्वी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध पदांवर काम केलेलं होतं.
तसेच भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयात अतिरिक्त सचिव, तसेच राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे महासंचालक आणि केरळ सरकारमध्ये प्रधान सचिव आणि केएलट्रॉनचे व्यवस्थापकीय संचालक अशी महत्त्वाची पदे देखील त्यांनी भूषवलेले आहेत. संरक्षण क्षेत्रासह त्यांनी डिजिटल इंडिया प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यूपीआयसह आधार आणि सरकारी ई-मार्केटप्लेसमध्येही त्यांचं योगदान आहे.