Gautam Adani on PM Narendra Modi : उद्योगपती तथा अब्जाधीश गौतम अदाणी यांनी मागील काही काळात उद्योगविश्वात मोठी प्रगती केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरदहस्त असल्यामुळेच त्यांनी ही प्रगती साधली आहे, असा आरोप राजकीय गोटातून केला जातो. याच मुद्द्यावर गौतम अदाणी यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची किती जवळीक आहे? त्यांचे यश आणि मोदी यांचा संबंध काय? याबाबत अदाणी यांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा >>> “धीरुभाई अंबानी माझं प्रेरणास्थान”, गौतम अदानींनी केला खुलासा, म्हणाले “एक नम्र व्यक्ती…”

इंडिया टुडे या इंग्रजी माध्यमाने अदाणी यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत अदाणी यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मोदी आणि मी गुजरात राज्यातून आलो आहोत, त्यामुळे माझ्यावर वेगवेगळे आरोप करण्यात येतात असे अदाणी यांनी सांगितले आहे. “मी माझ्या प्रवासाची चार भागांत विभागणी करतो. माझ्या प्रवासाची सुरूवात ही राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाली. हे ऐकून अनेकांना आश्चर्यही वाटेल. राजीव गांधी यांच्या उदारीकरणाचे धोरण रबावले. यामुळे माझ्या उत्पादनांची निर्यात वाढण्यास मदत झाली. दुसरा टप्पा हा पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कार्यकाळातील आहे. नरसिंहराव आणि मनमोहन सांग यांनी अनेक आर्थिक सुधारणा केल्या. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा मलादेखील लाभ झाला. तिसरा टर्निंग पॉईंट हा १९९५ साली आला. या काळात केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी सागरी किनारपट्टीच्या विकासावर भर दिला. त्यामुळे मुंद्रा येथे माझे पहिले बंदर उभारण्यास मदत झाली,” अशी माहिती गौतम अदाणींनी दिली.

हेही वाचा >> Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांवरही गौतम अदाणी यांनी भाष्य केले. “नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विकासकामांवर मोठा भर दिला. त्यांनी आर्थिक तसेच सामाजिक सुधारणा करण्यासाठी अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी केली. त्यांच्या काळात उद्योग क्षेत्र तसेच रोजगारात वाढ झाली. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाही अशीच स्थिती आहे,” असे गौतम अदाणी यांनी सांगितले.

“माझ्याविरोधात अनेक अख्यायिका पसरवल्या जातात. माझ्याविरोधात केले जाणारे सर्व आरोप निराधार असून ते पुर्वग्रहातून करण्यात येतात. खरे पाहता कोणत्याही एका नेत्यामुळे मला हे यश मिळालेले नाही. मागील तीन दशकांतील अनेक नेते आणि वेगवेगळ्या सरकारच्या सहकार्याने मी हे करू शकलो,” असे अदाणी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> अदाणींच्या आर्थिक संकटाचा भार SBI वर पडणार? हजारो कोटींचं दिलंय कर्ज! बँकेचे अध्यक्ष म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्व मिळालेले आहे. मोदी यांनी फक्त धोरणात्मक बदल केलेला नाही. तर सामान्य भारतीयाच्या जीवनात बदल घडवणाऱ्या योजनांतही त्यांनी बदल केलेला आहे. भारताची अर्थव्यवस्थाच नव्हे तर देशाच्या सामाजिक स्थितीतही बदल व्हावा यासाठी मोदी यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मोदी यांच्याकडून सामाजिक, शेती, आर्थिक, अविकसित क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्र करण्यात येत आहे,” असे म्हणत अदाणी यांनी मोदी यांची वाहवा केली.