CM Pramod Sawant On Goa Tourism : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत असल्याचे काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचे दावे फेटाळले आहेत. यामुळे गोव्याबद्दल चुकीचा संदेश जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि समुद्रकिनारे भरले आहेत. यावेळी त्यांनी या इन्फ्लूएन्सर्सना गोव्याला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्यटक राज्याकडे पाठ फिरवत असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, “मी देशातील सर्वांचे गोव्यात स्वागत करतो. डिसेंबर महिना गोव्यासाठी खूप महत्त्वाचा महिना असतो. नेहमीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय सणांपासून ते ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरपर्यंत असे वेगवेगळे सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.”

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे म्हणाले, “गोव्यातील नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे महिने पर्यटकांनी भरलेले असतात. आताही इथली सगळी हॉटेल्स भरलेली आहेत. काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवून इतर ठिकाणी जात असल्याचे म्हणत आहेत. ते चुकीचे करत आहेत, ते गोव्याबद्दल चुकीचा प्रचार करत आहेत. मला त्यांनाही सांगायचे आहे की त्यांनी स्वतः येऊन समुद्रकिनारे पाहावेत, गोव्यातील प्रत्येक रस्ता वाहनांनी भरलेला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक आले आहेत, रस्त्यावर खूप गर्दी आहे.”

हे ही वाचा : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक

गोव्यातील पर्यटकांची संख्या

गोव्याला भेट देणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांची संख्या २०१५ मध्ये सुमारे ५.२ दशलक्ष वरून २०२३ मध्ये ८.५ दशलक्षच्या पुढे गेली होती. २०१९ मध्ये गोव्याला जवळपास ९.४ लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. परंतु ओहेराल्डो नुसार नोव्हेंबरपर्यंत हा आकडा फक्त ४.३ लाखांवर आला होता.

हे ही वाचा : Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांची संख्या वाढल्याने गोव्याला फटका

पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गोव्याला अतिपर्यटन, ध्वनी प्रदूषण, समुद्रकिनाऱ्यावरील कचरा, ट्रॅफिक जाम, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, टॅक्सी माफियांचे वर्चस्व, पाणी टंचाई आणि तेथील पर्यावरणाचा ऱ्हास या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येचा फटका केवळ स्थानिकांनीच नव्हे, तर गोव्याला (Goa Tourism) येणाऱ्या पर्यटकांनीही वारंवार बसत आहे.