भर मांडवातून नवरी पाळून गेल्याच्या बातम्या खूप पाहिल्या असतील. बऱ्याचदा मनाविरुद्ध लग्न होतंय म्हणून नवरदेवही पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु पळून गेलेल्या नवरदेवाला रस्त्यात अडवून नवरीने परत आणल्याची घटना नुकतीच उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली आहे. खरंतर या जोडप्याचं अडीच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नसाठी मंदिरात मांडव उभारला, भटजी आले, लग्नाची पूर्ण तयारी झाली. परंतु अचानक नवरदेवाचा मूड बदलला आणि तो मांडवातून पळून गेला. बराच वेळ नवरदेव कुठे दिसला नाही म्हणून नवरी थेट तिच्या नवरदेवाला शोधण्यासाठी बाहेर पडली. नवरदेव बसने पळून जात होता. तेव्हा नवरी तिथे आली आणि तिने तिच्या नवरदेवाला बसमधून खाली उतरवलं. तब्बल दोन तास नवरदेव आणि नवरीमध्ये हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. नवरीने तिच्या पळून जाणाऱ्या नवरदेवाला बसमधून खाली उतरल्यावर दोघांचा भर रस्त्यात ड्रामा सुरू होता, हे नाट्यदेखील बरेलीवासियांना पाहायला मिळालं. एकीकडे नवरदेव त्याच्या नवरीला फसवून पळून जात होता तर इतर लोक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. परंतु नवरीने हार मानली नाही. तिने शेवटपर्यंत पाठलाग करून नवरदेवाला हाताला धरून परत मांडवात आणलं आणि त्याच्याशी लग्नगाठ बांधली. या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवरा मुलगा आणि नवरीने त्यांच्या इच्छेने लग्न ठरवलं होतं. बरेलीतल्याच भूतेश्वर नाथ मंदिरात मांडव सजला होता. सर्वजण तयारीला लागले होते. नवरी मुलगी देखील सजून मांडवात बसली होती. तेवढ्यात नवरीला समजलं की, तिचा नवरदेव पळून जातोय. त्यामुळे नवरीदेखील त्याच्यापाठोपाठ मांडवातून निघाली. त्यानंतर नवरदेव ज्या बसने पळून निघाला होता ती बस २० किलोमीटर अंतरावर नवरीने गाठली आणि नवरदेवाला पकडून खाली उतरवलं. तेव्हा नवरदेव म्हणाला, मी माझ्या आईला आणायला जातोय. त्यानंतर मी बोहल्यावर चढेन. परंतु नवरीने त्याचं काही ऐकलं नाही. रस्त्यावर दोघांमध्ये भांडणही झालं. नवरीने त्याला हाताला धरून मांडवात आणलं त्यानंतर दोघांनी लग्न केलं. हे ही वाचा >> जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले… खरंतर नवरदेव मांडवातून निघून गेल्यावर नवरीने त्याला अनेक फोन केले. त्यानंतर होणाऱ्या पत्नीचा एक फोन कॉल त्याने उचलला आणि सांगितलं, मी माझ्या आईला घेऊन येतो. त्यानंतर नवरी नवरदेवाच्या पाठोपाठ गेली. बरेली शहरापासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर भमोरा गावात बस पोहोचली असताना नवरीने ती बस गाठली आणि नवरदेवाला पकडलं. नवरदेवाला तिने बसमधून खाली उतरवल्यावर रस्त्यावर मोठा तमाशा झाला. लोक हे सगळं नाट्य पाहात होते.