महिलांवर जातिआधारित अत्याचार करणारे कायद्याच्या कचाटय़ातून सुटता कामा नयेत. कारण महिलेला जात आणि लिंगभेदावर आधारित अशा दुहेरी अत्याचारांना सामोरे जावे लागते, भारतीय समाजाला लागलेला हा डाग आपल्याला पुसून टाकता आला पाहिजे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क प्रमुख नावी पिल्ले यांनी केले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या पाश्र्वभूमीवर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आपल्या हक्कांचा गैरवापर करणारे नेहमीच उजळ माथ्याने समाजात वावरत असतात. हा प्रकार संपविता आला पाहिजे. नावी पिल्ले या भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकन आहेत. महिलांविरोधातील अन्याय, अत्याचारांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा खराब झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊं येथे दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवल्याच्या घटनेनंतर देशात मोठा असंतोष पसरला. अत्याचाराला बळी पडलेल्या दोघी खालच्या जातीतील असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही. याचा निषेध म्हणून मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून उतरवण्यास नकार दिला. ही घटना आपल्या समाजाला शोभा देणारी नाही, असे पिल्ले म्हणाल्या. भेदभावाची वागणूक आणि हिंसाचार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, हे कायदा राबवून आपल्याला सांगता आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hard punishment for those who do racial violence against women
First published on: 19-06-2014 at 12:46 IST