गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलामवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काहीही झाले तरी भारत आणि चीनला एकमेकांच्या शेजारीच राहायचे आहे. त्यामुळे 'हिंदी-चिनी भाई भाई' या मंत्राशिवाय पर्याय नसल्याचे मत दलाई लामा यांनी व्यक्त केले. जनता हीच देशाची खरी शासक असते. तसेच देशातील वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी लोकांना सत्य परिस्थितीविषयी माहिती देणे आणि प्रबोधन करणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या लहानशा तिबेटियन समाजात पूर्णपणे लोकशाही आहे. मी स्वत:ही लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. लवकरच चिनी जनता आमची ही पद्धत अंगिकारेल आणि कम्युनिस्ट पक्षाला लोकशाही पद्धतीचा अवलंब करावाचा लागेल, असे दलाई लामा यांनी सांगितले. भारतात स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी या ठिकाणी अनेक गोष्टी करू शकतो आणि मला अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही, ती जागा मला पसंत नाही, असे सांगत त्यांनी चीनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यावेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील वादावरही भाष्य केले. भारत आणि चीनला डोकलाम प्रश्नावर शांततेनेच तोडगा काढावा लागेल. 'हिंदी-चिनी भाई भाई' याच मार्गाने गेल्यास हा तोडगा शक्य आहे. भारत व चीन दोन्हीही सामर्थ्यशाली देश आहेत. काहीही झाले तरी आपल्याला एकमेकांच्या बाजूला राहायचे आहे, हे दोन्ही देशांनी कायम ध्यानात ठेवले पाहिजे, असा सल्ला दलाई लामा यांनी दिला. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात तेथे डोकलाम हा प्रदेश आहे. त्या भागावर चीन आपला हक्क सांगत असला तरी सध्या हा प्रदेश भूतानच्या अंतर्गत येतो. डोकलामवरुन चीन आणि भूतानमध्ये वाद असून दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण अजूनही या वादावर तोडगा निघू शकलेला नाही. डोकलाम भूतानमध्ये असल्याने त्याचा थेट भारताशी संबंध नाही. मात्र भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार झाल्याने भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. डोकलाम भागात चिनी सैन्याने सुरू केलेल्या रस्तेबांधणीला भारतीय लष्कराने जोरदार आक्षेप घेतला होता. डोकलामपासून जवळच संपूर्ण ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ ऊर्फ ‘चिकन्स नेक’ हा संवेदनशील टापू आहे. त्यामुळे डोकलामचे संरक्षण हे भारतासाठी महत्त्वाचे मानले जाते.