निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी एका लेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्याला प्रामाणिकपणाची किंमत चुकवावी लागत असल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी प्रामाणिकपणाची एक किंमत असते. भलेही त्या प्रामाणिकपणाची किंमत थेट किंवा नुकसानीच्या स्वरुपात चुकवावी लागू शकते, असे लवासा यांनी इंडियन एक्स्प्रेसमधील आपल्या लेखात म्हटले आहे.
लवासा म्हणतात, “त्या लोकांकडून कोणत्याही स्वरुपाची अपेक्षा ठेवणं मुर्खपणाचं आहे. ज्यांचा प्रामाणिकपणे आणि नम्रपणे विरोध करण्यात आला आहे. प्रामाणिक लोकांना एकट्याला आपल्या कृत्याची किंमत चुकवावी लागते. कधी-कधी तर त्याला एकटे राहण्यास भाग पडते.”
“जर एखाद्या लोकसेवकाने सार्वजनिक हिताशी तडजोडशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला बेईमानी ठरवलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या हस्तक्षेपालाही आपल्या बाजूने मानले जाऊ शकत नाही. वरिष्ठ स्तरावर विवेकाचा वापर गरजेचा असतो. कारण कधी कधी नियमांद्वारे लोकांना भडकावणे अश्यक्य होऊन जाते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशोक लवासा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना आचारसंहिता भंगप्रकरणी क्लीनचीट देण्यास विरोध केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि बहिणीची प्राप्तिकर खात्यामार्फत चौकशी झाली होती. काही दिवसांपूर्वीच प्राप्तिकर विभागाने लवासा यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीच्या विक्रीमध्ये स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा आरोप करीत याच्या चौकशीसाठी हरयाणा सरकारला पत्र लिहिले होते. याला लवासा कुटुंबियांनी चुकीची कारवाई असल्याचे सांगत आपल्या कुटुंबाला त्रास देण्याासाठी आणि बदनाम करण्यासाठीचा हा कट असल्याचे म्हटले आहे.