77th Independence Day : भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उद्या (१५ ऑगस्ट) रोजी साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

‘या’ मान्यवरांना विशेष निमंत्रण

लाल किल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील सुमारे १८०० जणांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून हा उपक्रम आहे. या विशेष अतिथीमध्ये ६६० पेक्षा जास्त गावांचे ४०० सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील २५० व्यक्ती, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पंतप्रधान कौशल विकास योजनेमधले प्रत्येकी ५० व्यक्ती, सेन्ट्रल विस्टा प्रकल्प, नवे संसद भवन, सीमावर्ती भागातली रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजनेसाठी काम करणारे ५० श्रमयोगी (बांधकाम मजूर), ५० खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छिमार वर्गातले प्रत्येकी ५० जणांचा समावेश आहे. यापैकी काही विशेष अतिथी दिल्लीमधील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेणार आहेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात प्रत्येक राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ७५ जोडप्यांनाही त्यांच्या पारंपरिक पोषाखात आमंत्रित करण्यात आले आहे.

१२ सेल्फी पॉइंटस उभारले

केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉइंटस’ १२ महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे.

‘सेल्फी पॉइंटस’मध्ये लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ सर्वोत्कृष्ट सेल्फींना मिळणार पारितोषिक

स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर १५-२० ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या १२ पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.