भारताबरोबर जर्मनी, ब्राझील आणि जपानसारखे देश संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे कायमच सदस्य हवेच तसेच सुरक्षा समितीची पुर्नबांधणी करुन या प्रमुख देशांचा समावेश करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घ्यायला हवा असं मत फ्रान्सने संयुक्त राष्ट्रांच्या समितीसमोर व्यक्त केले आहे. तसेच भारताबरोबरच इतर महत्वाच्या देशांना कायमचे सदस्य म्हणून दर्जा मिळवून देण्याच्या विषयाला आमचे प्राधान्य असल्याचे फ्रान्सने स्पष्ट केले आहे.
भारत हा मागील बऱ्याच काळापासून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये कायमचे सदस्यत्व मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारतासारख्या देशांना सुरक्षा समितीमध्ये कायमचे स्थान मिळायलाच हवे असा पाठपुरावा फ्रान्सने केला आहे. ‘फ्रान्स आणि जर्मनी दोन्ही देशांची धोरणे ही एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. या धोरणांनुसार सुरक्षा समितीला अधिक मजबूत करणे काळाची गरज असून यामाध्यमातून या समितीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सदस्यांना स्थान द्यायला हवे. आम्ही नवीन देशांना कायम सदस्यत्व देण्याच्या बाजूने असून याबद्दल कोणतेही दुमत नाही’ असं मत फ्रान्सचे संयुक्त राष्ट्रातील अधिकारी फ्रॅन्स्को डेलाट्रे यांनी फ्रान्सची बाजू मांडताना व्यक्त केले. फ्रान्स हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमधील कायमचे सदस्यत्व असणारा देश असल्याने या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
जर्मनीला देण्यात आलेल्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल महिन्यात संपली आहे. याचबद्दल बोलताना डेलाट्रे यांनी, ‘जर्मनी, जपान, भारत, ब्राझील आणि आफ्रिकेमधील देशांना सुरक्षा समितीमध्ये प्रातिनिधित्व मिळायलाच हवे. आमच्यासाठी हा विषय अग्रस्थानी आहे’ असं म्हटलं आहे. सुरक्षा समितीमध्ये नवीन देशांचा समावेश करुन समितीला अधिक बळकटी द्यायला हवी असंही फ्रान्सने म्हटलं आहे.
फ्रान्सने अशाप्रकारे भारताचे समर्थन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या जैश ए महम्मद या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी ठरवण्यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मांडला होता. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर चीन नकाराधिकार वापरून अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात खोडा घातला होता.