India Pakistan Tensions: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भारतीय नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आणि पाकिस्तानच्या पापांचा घडा भरला, असं म्हणत भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओंची आज दुपारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत घई यांनी ऑपरेशन सिंदूरचे बारकावे सांगतानाच पाकिस्तानकडून एवढ्या मोठ्या संख्येनं ड्रोन हल्ले करण्यात येऊनही भारतानं ते कसे निष्प्रभ केले, याची सविस्तर माहिती दिली.
दहशतवादी कारवायांचं बदललेलं स्वरूप
यावेळी राजीव घई यांनी दहशतवादी कारवायांचं गेल्या काही वर्षांत बदललेलं स्वरूप अधोरेखित केलं. “आपल्याला या सर्व कारवाईचा एका विशिष्ट दृष्टीकोनातून विचार करणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांत दहशतवाद्यांच्या कारवाईच्या पद्धतीत बदल होताना दिसत होता. आपल्या लष्कराबरोबरच सामान्य नागरिकांवरदेखील हल्ले होऊ लागले होते. २०२४ मध्ये जम्मूमध्ये शिवकोरी मंदिरात जाणारे प्रवासी आणि या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निरपराध पर्यटक या भयानक बदलाचेच उदाहरण आहेत. पहलगाम हल्ल्यापर्यंत पापाचा घडा भरला होता”, असं घई म्हणाले.
“पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांची आधीच कल्पना होती”
दरम्यान, पाकिस्तानकडून हवाई हल्ले केले जातील, याची आधीच कल्पना होती, असं लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी स्पष्ट केलं आहे. “दहशतवाद्यांवर आपले केंद्रीत हल्ले नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा पार न करता करण्यात आले होते. आम्हाला पूर्ण अंदाज होता की पाकिस्तानचा हल्लाही सीमेच्या त्या बाजूनेच होईल. त्यामुळेच आम्ही आपल्या हवाई सुरक्षेची पूर्ण तयारी आधीच केली होती. यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाकिस्तानच्या हवाई दलाने आपल्या हवाई तळांवर सातत्याने हल्ले केले, तेव्हा ते सगळे या यंत्रणेसमोर निष्प्रभ ठरले”, असं घई यांनी स्पष्ट केलं.
अनेक स्तराची सुरक्षा यंत्रणा…
दरम्यान, पाकिस्तानी ड्रोनचे हल्ले कसे निष्प्रभ केले, याचं श्रेय घई यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपासून आत बसवण्यात आलेल्या अनेक स्तरांच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला दिलं.
“आंतरराष्ट्रीय सीमेपासून अनेक स्तरांची ही सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली होती. रडार, मानवरहीत हवाई यंत्रणा, त्यामागे शोल्डर फायर्ड शस्त्र, त्यानंतर विंटेज एअर डिफेन्स शस्त्र आणि शेवटी आपली अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम होती. त्यामुळे पाकिस्तानला ही अनेक स्तरांची सुरक्षा व्यवस्था पार करून आपल्या हवाई तळांवर हल्ला करण्याची संधीच नव्हती”, असं त्यांनी नमूद केलं.