विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास आठवडा उलटला तरी एक-दोन सामन्यांचा अपवाद वगळल्यास, सर्वच सामने नीरस आणि रटाळ झाले आहेत. त्यामुळे सर्वानाच आता भारताच्या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. असंख्य चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडभूमीत दाखल झाला असून त्यांना विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात आत्मविश्वास काहीसा ढेपाळलेल्या दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यावी लागेल.

सध्याच्या युगातील कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जात आहे. पण या विश्वचषकाच्या निमित्ताने त्याचे नेतृत्वगुण अधोरेखित होणार आहेत. सध्याच्या भारतीय संघात कोहलीसह सामना एकहाती जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा असला तरी भारताला २०११च्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

२०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर जवळपास दोन वर्षे भारतीय संघाची बांधणी केल्यानंतरही भारताला चौथ्या क्रमांकाची चिंता सतावत होती. पण बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकावत लोकेश राहुलने आपणच या क्रमांकासाठी योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे.

डेल स्टेनने विश्वचषकातून माघार घेतली आहे, तर लुंगी एन्गिडीने मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात जोफ्रा आर्चरचा चेंडू हशिम अमलाच्या हेल्मेटवर आदळल्यामुळे तोसुद्धा जायबंदी झाला होता.

भारतीय फलंदाजांचा दबदबा

द रोज बाऊल स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पोषक असल्याने तसेच दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजांच्या दुखापतींमुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांचा दबदबा राहण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या दोन्ही सलामीवीरांना गेल्या पाच महिन्यांत सर्वोत्तम कामगिरी करता आली नसली तरी त्यांच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. विराट कोहली सध्या चांगल्या लयीत असून लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी,  हार्दिक पंडय़ा आणि केदार जाधव यांनी गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

चौथ्या क्रमांकावर कोण?

पहिल्या सामन्यात अंतिम संघात कुणाला संधी द्यायची, याची चिंता भारतीय संघ व्यवस्थापनाला नसली तरी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा तिढा बुधवारी भारताला सोडवावा लागणार आहे. लोकेश राहुलने सराव सामन्यात खणखणीत शतक झळकावून कोहलीच्या चिंता मिटवल्या असल्या, तरी विजय शंकरला संधी द्यायची की राहुलचा पर्याय निवडायचा, याचा अंतिम निर्णय कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना घ्यावा लागणार आहे.

भारतच प्रबळ दावेदार

इतिहास दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने असला तरी या सामन्यात विजयासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत ५-१ असे हरवण्याची करामत कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केली होती. सध्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असून त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतीय खेळाडूंची सध्याची कामगिरी पाहता, या सामन्यात भारताचेच पारडे जड मानले जात आहे.

द रोज बाऊल स्टेडियमवर भारतीय संघ

आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यात फक्त एकमेव विजय केनियाविरुद्ध मिळवता आला आहे. यजमान इंग्लंडकडून भारताला २००७ आणि २०११मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सामना क्र. 8

भारत वि. दक्षिण आफ्रिका

स्थळ : रोज बाऊल स्टेडियम, साऊदम्पटन

सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स हिंदी १.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू  प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, ब्युरन हेंड्रिक्स, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.

आमनेसामने

एकदिवसीय   

सामने : ८३, दक्षिण आफ्रिका  : ४६, भारत : ३४, टाय / रद्द : ३

विश्वचषकात  

सामने : ४, भारत : १,

दक्षिण आफ्रिका : ३, टाय / रद्द : ०

खेळपट्टीचा अंदाज

द रोज बाऊल स्टेडियमवर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेतील सामना होत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असून धावांची बरसात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा संघ ३५०पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

केदार पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याच्याविषयी सकाळीच अंतिम निर्णय घेण्यात येईल. दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह आम्ही मैदानात उतरू.

– विराट कोहली