US Role in India-Pakistan Ceasefire: २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भीषण हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्याची मागणी केली जाऊ लागली. पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी ७ मे रोजी मध्यरात्री भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. तेव्हापासून गेल्या चार दिवसांत दोन्ही देशांमधील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झालं आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अचानक १० मे रोजी दुपारी शस्त्रविराम झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

दोन्ही देशांच्या लष्कराच्याही आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच या शस्त्रविरामाची घोषणा केल्यामुळे चर्चेला उधाण आलं. त्यात भारताकडून हा शस्त्रविराम दोन देशांमधील चर्चेतून झाला असून तिसऱ्या देशाचा यात सहभाग नसल्याची भूमिका घेतली गेल्यानंतर यातलं गूढ अधिकच वाढलं. विशेष म्हणजे शस्त्रविरामावर भारत व पाकिस्तान यांनी सहमती दर्शवल्यानंतर देखील पाकिस्तानकडून काही तासांत पुन्हा सीमेवर ड्रोन डागण्यात आले. त्यालाही भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं. गेल्या २० दिवसांपासून चालू असलेल्या तणावानंतर गेल्या १० दिवसांत झालेले फोनकॉल्स आणि चर्चेतून अंमलात आलेला शस्त्रविराम याचा घटनाक्रम महत्त्वाचा ठरला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

मार्को रुबियोंचा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फोन

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फोन केला. भविष्यातील तणाव टाळण्याच्या दृष्टीने चर्चा घडवून आणण्यासाठी अमेरिका मदत करू शकेल, असं मुनीर यांना सांगितल्याचं मार्को रुबियो म्हणाले. पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांमागे असणारे लष्करप्रमुख मुनीर यांच्याशी अमेरिकन सरकारनं केलेली ही पहिली चर्चा होती. याच मुनीर यांच्यामुळे कारगिल युद्धापासून शांत असलेली दोन्ही देशांमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली होती.

काय घडलं गेल्या १० दिवसांत?

वॉशिंग्टन डीसीवरून या पहिल्या फोनकॉलनंतर १ मे रोजी रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करून तणाव कमी करण्यासाठी व दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षा राखण्यासंदर्भात प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं.

७ मे रोजी भारतीय लष्करानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. पाकव्याप्त जम्मू-काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी हल्ले करण्यात आले. यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लागलीच मार्को रुबियो यांना यासंदर्भात माहिती दिली.

८ मे रोजी मार्को रुबियो यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच, सध्याचा तणाव तातडीने निवळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शिवाय, भारत व पाकिस्तान यांच्यात थेट संवाद निर्माण करण्यासाठी मध्यस्थी करण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली.

अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या फोन कॉल्समुळे डोनाल्ड ट्रम्प व अमेरिकन सरकारने या शस्रविरामाचं श्रेय आपल्याकडे घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याचवेळी भारतानं मात्र हा शस्त्रविराम दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेतून आला असून त्यात तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता, अशीच भूमिका ठेवली आहे.

भारताचा एअर स्ट्राईक आणि पाकिस्तानची आगळीक

७ मे च्या मध्यरात्री भारतीय लष्करानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने पश्चिम सीमेवरील भारतीय लष्करी तळांना, नागरी वस्तींना लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले. पण भारतानं ते सर्व निष्प्रभ केले. ८ मे रोजी भारतीय हवाई दलानं थेट लाहोर येथील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली.

यानंतर पाकिस्ताननं जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरपासून थेट जैसलमेरपर्यंतच्या लष्करी तळांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले. भरातीय सुरक्षा यंत्रणेनं तब्बल ४०० ड्रोन हवेत उद्ध्वस्त केले. १० मे रोजी पाकिस्ताननं पुन्हा आगळीक करत श्रीनगरवर ड्रोन डागण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेनं तोही हाणून पाडला. पण शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्ताननं दिल्लीपासून अवघ्या २४० किमी अंतरावरील सिरसाला लक्ष्य करून ड्रोन डागलं. भारतीय यंत्रणांनी तेही पाडलं.

पण चंदीगडमधील हल्ल्यावरून एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे पाकिस्तानचे हल्ले हे फक्त जम्मू-काश्मीर किंवा भारताच्या पश्चिम सीमेपुरतं मर्यादित नसून ते आतल्या भागालाही लक्ष्य करू लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानला आर्थिक मदतीचा हात

या सगळ्या घडामोडींमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विरोधानंतरदेखील पाकिस्तानला आर्थिक मदत पॅकेजचा हप्ता मंजूर केला. यातून पाकिस्तानकडून विजयी आविर्भावात दावे करण्यात येऊ लागले. पण भारतासाठी या कारवाईतून दहशतवादविरोधात आक्रमक प्रत्युत्तराचा संदेश पाकिस्तानला दिला गेला. यापुढे जर दहशतवादी हल्ले झाले, तर ती युद्धाचीच कृती ठरेल, असा संदेशही पाकिस्तानला दिला गेला.