India-Pakistan DGMO Level Meeting: १० मे रोजी दुपारी संध्याकाळी ५ वाजू ३३ मिनिटांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर भारत व पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्याचं जाहीर करून टाकलं आणि चर्चेला सुरुवात झाली. एकीकडे भारत व पाकिस्तान यांच्यात सीमेवर धुमश्चक्री चालू असताना दुसरीकडे ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं. तासाभराने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविरामाची घोषणा केली. पण शस्त्रविरामाच्या आधी अशा काय घडामोडी घडल्या आणि भारत किंवा पाकिस्तानऐवजी थेट अमेरिकेने शस्त्रविराम कसा जाहीर केला? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे रोजी संध्याकाळी शस्त्रविरामाची घोषणा करण्याच्या आधी २४ तासांत नेमकं काय घडलं, यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे. वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या चर्चेतून शस्त्रविरामाआधी घडलेल्या सर्व घडामोडींचा आढावा या वृत्तात घेण्यात आला आहे.
पाकिस्तानला मान्य होईल अशा तोडग्यासाठी दबाव!
९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि त्यांना सांगितलं की भारत व पाकिस्तानदरम्यानचा हा तणाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. तसेच, यावेळी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींवर पाकिस्तानला मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी दबाव आणला, अशी माहिती या सर्व चर्चेशी संबंधित उच्चपदस्थांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.
पंतप्रधान मोदींचं स्पष्ट उत्तर
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हान्स यांच्याशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. जर पाकिस्ताननं आता आगळीक केली, तर त्यांनी हे समजून घ्यावं की आता भारताकडून येणारं उत्तर खूप आक्रमक स्वरुपाचं असेल, असं मोदींनी व्हान्स यांना सांगितलं. थोडक्यात, भारतानं पाकिस्तानला मान्य होईल असा तोडगा देण्याची आवश्यकता नसून पाकिस्तान काय करतंय हे अमेरिकेनं आधी पाहावं, असं मोदींनी व्हान्स यांना सांगितल्याचं या अधिकाऱ्याने नमूद केलं.
..आणि काही तासांत पाकिस्ताननं हल्ला केला!
दरम्यान, मोदींची व्हान्स यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सीमेवर पाकिस्तानकडून भारतातील २६ ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यात आदमपूरमधील हवाई दलाचा तळ आणि नगरोटामधील आर्मीचा तळदेखील होता. भारतानं हे सर्व हल्ले निष्प्रभ केले. एवढंच नाही, तर उलट पाकिस्तानमधील आठ हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केले.
भारतीय हवाई दलाच्या भीषण प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान घायाळ झाल्यानंतर १० मे रोजी सकाळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना फोन केला. त्याआधी त्यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांच्याशी चर्चा झाली होती. पाकिस्तानकडून हल्ला झाला नाही, तर भारतही हल्ला करणार नाही ही भूमिका पाकिस्तानला मान्य असल्याचं रुबियो यांनी जयशंकर यांना कळवलं. यासंदर्भात पाकिस्ताननं आपल्याला सहमती कळवल्याचंही रुबियोंनी सांगितलं.
अमेरिकेमुळे नाही, भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान नरमलं!
दरम्यान, अमेरिकेनं मध्यस्थी केल्यामुळे नसून भारताच्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान नरमल्याचं या मोहिमेशी संबंधित उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं. “पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन का केला असेल? कुणीतरी फोनवर चांगल्या इंग्रजीत त्यांच्याशी बोललं म्हणून नाही. आपल्या बाजूने आकाशातून काहीतरी त्यांच्या भूमीवर कोसळल्यानंतर येणाऱ्या भीषण आवाजांमुळे त्यांना फोन करणं भाग पडलं”, असं त्यांनी नमूद केलं.
“खरंतर पाकिस्ताननं भारताच्या माऱ्यामुळे अचानक घुमजाव केलं. पण आम्हाला हे थेट पाकिस्तानच्या तोंडून ऐकायचं होतं. शस्त्रविरामासंदर्भातला संदेश थेट पाकिस्तानकडून यायला हवा होता. त्यांच्या डीजीएमओनं फोन करायला हवा होता. चर्चेचा तोच एकमेव मार्ग आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
७ मे रोजीच जयशंकर यांनी हे रुबियोंना सांगितलं होतं!
दरम्यान, भारताची ही भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी ७ मे रोजीच मार्को रुबियो यांना कळवली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. “अशी चर्चा दोन्ही बाजूंच्या डीजीएमओंमध्ये होणं हीच पद्धत आहे”, असं त्यांनी बजावलं होतं.
“त्यानुसार १० मे रोजी दुपारी १ वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओंनी फोन केला होता. पण आपले डीजीएमओ बैठकीत होते. त्यामुळे दोघांचं बोलणं दुपारी ३.३० वाजता झालं. मला वाटतं कदाचित अमेरिकेला शस्त्रविरामासंदर्भात पाकिस्तानकडूनच समजलं असेल. दुपारी साडेतीननंतर आपले डीजीएमओ वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी गेले. पाकिस्तानच्या डीजीएमओंनीही हेच केलं असेल. यादरम्यान अमेरिकेनं शस्त्रविरामाचा मुद्दा जगजाहीर करून टाकला”, अशी माहिती या प्रक्रियेशी संबंधित सूत्रांनी दिली.
अमेरिकेनं याबद्दल कल्पनाच दिली नव्हती
ही सर्व चर्चा घडत असताना अमेरिकेकडून भारत व पाकिस्तानदरम्यान शस्त्रविरामासाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा करणार असल्याबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती. तसेच, ट्रम्प यांच्या सोशल मिडिया पोस्टबाबतही काही माहिती देण्यात आली नव्हती!