India Pakistan : भारतातल्या काश्मीर या ठिकाणी असेलल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर २२ एप्रिल रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. आधी धर्म विचारला आणि त्यानंतर निष्पाप पर्यटकांना ठार करण्यात आलं. २६ भगिनींचं कुंकू पुसण्यात आलं. या घटनेचा जगाने निषेध नोंदवला. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे हे समजताच पाकिस्तानचा बदला घेतला पाहिजे अशी जनभावना होती. ज्यानंतर ६ आणि ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि पाकिस्तानला करारा जवाब देण्यात आला. मागच्या तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी शस्त्रविराम देण्यात आला. पाकिस्तानने राफेल विमान पाडलं का? या प्रश्नावर एके भारती यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले एके भारती?
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. यातून आम्हाला पाकिस्तानला इशारा द्यायचा होता की, भारतीय सैन्य तयार असले, तरी आम्हाला पाकिस्तानच्या सैन्याशी संघर्ष करायचा नाही, तर दहशतवाद्यांशी करायचा आहे. ८ मेच्या रात्री १० वाजून ३८ मिनिटांनी पाकिस्तानने श्रीनगरपासून नलियापर्यंत हल्ले केले. मात्र, भारतीय सुरक्ष दल पूर्ण तयार होतं. त्यामुळे त्यांना जे नुकसान करायचं होतं ते त्यांना करता आलं नाही. ७ मे रोजी युएव्ही हल्ले झाले, मात्र ८ मे रोजी युकेव्ह आणि युएव्हीची संख्या कमी होती आणि कॉटकॉप्टर्सची संख्या अधिक होती. याचा हेतू देखरेख ठेवणं किंवा नागरिकांना त्रास देणं असा असावा. पाकची ही आगळीक मध्यरात्रीपर्यंत चालली, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.

भारताचं राफेल विमान पाकिस्तानने पाडलं का?
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत. नुकसान हा लढाईचा भाग असतो. भारताचे राफेल विमान पडले की नाही, असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की, किंबहुना आम्हीही स्वत:ला विचारला पाहिजे की, आपण आपलं लक्ष्य साध्य केलं का? दहशतवादी तळ लक्ष्य करण्याचं आपलं उद्दिष्ट साध्य केलं का? तर याचं उत्तर निर्विवादपणे हो असे आहे. आपण अजूनही युद्धजन्य परिस्थितीत आहोत. मी त्यावर (राफेल विमानाबाबत) आता काही बोललो तर ते शत्रूला फायदा होऊ शकतो. आम्हाला त्यांना कोणताही फायदा किंवा आघाडी मिळून द्यायची नाही. मी इतकंच सांगेन की, आम्ही ठरवलेलं उद्दिष्ट आम्ही साध्य केलं. आपले सगळे पायलट सुखरुप माघारी परतले आहेत, असे एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले.
पाकिस्तानचे ३५ ते ४० जवान ठार झाल्याचीही दिली माहिती
भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील संघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील ३५-४० जवान मारले गेल्याचीही माहिती दिली.