India Pakistan Tension : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. त्या कारवाईनंतर पाकिस्तानची चलबिचल आणखी वाढली असून पाकिस्तान आता भारताच्या दिशेने तथा सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करत आहे. मात्र, या ड्रोन हल्ल्य़ाला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे.

पाकिस्तानने शुक्रवारी (९ मे) रात्री केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याची माहिती सरकारी सूत्रांच्यावतीने सांगितली जात आहे.भारतातील विशेषतः जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणांना पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जात आहे. केंद्र सरकार सकाळी १० वाजता पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याबद्दल आणि भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी पाकिस्तानने दावा केला की, भारताने इस्लामाबाद जवळील एका हवाई तळासह तीन क्षेपणास्त्रे डागली. मात्र, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने या हल्याला रोखल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी रात्री उशिरा दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या एका निवेदनात म्हटलं की, “भारताने विमानांद्वारे हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रे डागली. नूर खान तळ, मुरीद तळ आणि शोरकोट तळांना लक्ष्य केलं”, असं निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

जम्मूमध्येही पहाटे ड्रोन हल्ले

जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळाला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानी सैन्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच तेथील स्थानिक रहिवाशांच्या मते पहाटेपर्यंत शहरात अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. दरम्यान, राजौरी शहरावर जोरदार तोफांचा मारा करण्यात आला. ज्यामध्ये मुख्य शहराला लक्ष्य करण्यात आलं होतं. पहाटेच्या सुमारास पठाणकोट शहरात देखील अनेक स्फोटांचे आवाज आले. कमीत कमी अर्धा तास अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. तसेच भारतीय सैन्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

श्रीनगरमध्येही पहाटे ड्रोन हल्ले

जम्मूमधील काही लष्करी छावण्यांसह नागरी वसाहतींनाही लक्ष्य करण्यात आलं. मात्र, नेमकी कोणत्या लष्करी छावण्यांसह नागरी वसाहतींनाही लक्ष्य करण्यात आलं? याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण तरीही जिल्हा प्रशासनाने हाय अलर्टची स्थिती जाहीर केली आहे. यावेळी रस्ते पूर्णपणे सुनसान होते. तसेच येथील रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि पूर्णपणे स्पष्ट सायरन वाजेपर्यंत उघड्यावर बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये विमानतळाजवळील भागातही सकाळी ५.२० वाजता आणि बारामुल्ला येथे पहाटे ४.५० वाजता व उधमपूर येथेही मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

फिरोजपूरमध्ये ड्रोन हल्ल्यात एका कुटुंबातील तीन जण जखमी

दरम्यान, भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरील अनेक शहरांमधील लष्करी छावण्यांना लक्ष्य करून पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र, शनिवारी पहाटे या ड्रोन हल्ल्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय लष्कराने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक ड्रोन रोखले आणि पाडले, तर पंजाबमधील फिरोजपूरमधील एका नागरी भागात एक सशस्त्र ड्रोन पडला. ज्यामध्ये एका कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले आहेत.

२६ ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन आढळून आले

भारतीय लष्कराने शुक्रवारी रात्री सांगितलं की, आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानशी असलेल्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला ते गुजरातमधील भूजपर्यंत २६ ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन आढळून आले. यामध्ये श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, कुआर बेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे. लष्कराने म्हटलं की, या ड्रोनमुळे नागरी आणि लष्करी लक्ष्यांना संभाव्य धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना विशेषतः सीमावर्ती भागातील नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

G७ परराष्ट्र मंत्र्यांनी निवेदन केलं जारी

शनिवारी सकाळी G७ परराष्ट्र मंत्र्यांनीही एक निवेदन दिलं. “आम्ही, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेचे G७ परराष्ट्र मंत्री आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि भारत आणि पाकिस्तान दोघांनाही जास्तीत जास्त संयम बाळगण्याची विनंती करतो. दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आम्हाला खूप काळजी आहे. आम्ही तात्काळ तणाव कमी करण्याचं आवाहन करतो आणि दोन्ही देशांना शांतेतेसाठी संवाद साधण्यास सल्ला देतो. तसेच आम्ही सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत आणि कायमस्वरूपी राजनैतिक तोडग्यासाठी आमचा पाठिंबा व्यक्त करतो,” असं त्यामध्ये म्हटलं आहे.