Schools Closed Amid Rising Border Tension : भारत पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव क्षणांगणित तीव्र होत आहेत. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे. या अंतर्गत पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीविरोधात सडेतोड प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे. दरम्यान, या अघोषित युद्धाची झळ सामान्य नागरिकांना पोहोचू नये याकरता उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यानुसार, जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील शाळा, महाविद्यालये काही दिवसांकरिता बंद ठेवण्यात येणार आहेत.

भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ले होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंजाबच्या सीमा सील करण्यात आल्या तर लढाऊ विमाने आणि ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी गुरुवारी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे निर्देश सर्व सरकारी, खाजगी आणि अनुदानित शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना लागू आहेत.

पाकिस्तानकडून आठ क्षेपणास्त्रे जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांकडे निर्देशित करण्यात आली आणि पाकिस्तान आणि चंदीगडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला .कपूरथळा जिल्हा प्रशासनाने सांगितले की, सर्व शाळा, कोचिंग सेंटर, आयईएलटीएस तयारी संस्था आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ९ आणि १० मे रोजी बंद राहतील. तथापि, परीक्षा देणाऱ्या संस्था सुरू राहतील, असे त्यात म्हटले आहे.

पंजाब विद्यापीठ, चंदीगडनेही गुरुवारी एक सूचना जारी करून ९, १० आणि १२ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली. “नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील,” असे परीक्षा नियंत्रकांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू काश्मीरमध्येही शाळांना सुटी

तसंच, जम्मू-काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठेही दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. खबरदारीची उपाययोजना असल्याचे अधोरेखित करत जम्मू-काश्मीरच्या शिक्षणमंत्री सकिना इटू यांनी पीटीआयला सांगितले की, “जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस बंद राहतील,”