नवी दिल्ली : रशिया-युक्रेन संघर्षांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असून, कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांना दिली. प्रदूषणमुक्त ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. यावेळी झालेल्या उभयपक्षी चर्चेत रशिया-युक्रेन संघर्ष, ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’, ‘फिनटेक’, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी मुद्यांवर भर देण्यात आला. शोल्झ यांच्याबरोबरील बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी नमूद केले, या समस्यांचे निराकरण केवळ संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे आणि ‘जी-२०’ च्या अध्यक्षपदी असतानाही भारत या दिशेने प्रयत्न करत आहे. ‘‘युक्रेनमधील घडामोडी सुरू झाल्यापासून भारताने हा संघर्ष संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा आग्रह धरला आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तयार आहे.’’

अशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडातील देशांवर युक्रेन संघर्षांचा नकारात्मक प्रभाव पडू नये, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या युद्धामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची पायाभूत सुविधा व उर्जा यंत्रणा नष्ट झाली आहे. आपण हिंसाचार करून (देशांच्या) सीमा बदलू शकत नाही, असे शोल्झ यांनी निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.