S Jai Shanakar २२ एप्रिलच्या दिवशी पाकिस्तानने केलेला भ्याड दहशतवादी हल्ला हा त्यांना जन्मभर लक्षात राहिल अशी अद्दल घडवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. दहशतवादी कल्पनाही करु शकणार नाहीत अशी शिक्षा दिली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ एप्रिलच्या भ्याड हल्ल्यानंतर सांगितलं होतं. २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवून त्यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग गडद झाल्याची चिन्हं आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इतर राष्ट्रांशी फोनवरुन चर्चा सुरु केली आहे.

एस जयशंकर यांचा कुठल्या देशांशी संवाद? काय म्हटलं आहे त्यांनी?

आम्ही दहशतवादविरोधी कारवाई केली आहे. पण पाकिस्तानने कुठलंही पाऊल उचललं तर त्याला तिथल्या तिथे उत्तर दिलं जाईल. असं भारतातर्फे विविध देशांशी झालेल्या संवादात एस. जयशंकर यांनी सांगितलं आहे. इराण, कझाकिस्तान, अमेरिका, युरोपातले विविध देश, इटली अशा देशांच्या प्रतिनिधी, अध्यक्ष, पंतप्रधानांशी एस. जयशंकर यांनी फोनवरुन संवाद साधला आहे. पाकिस्तानला आता योग्य आणि जशास तसं उत्तर दिलं जाईल असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध बैठका सुरु

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्यासह बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे.

ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही-राजनाथ सिंह

‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेलं नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. त्यामुळे बुधवारी पहाटे जरी भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादाचं कंबरडं मोडलं असलं, तरी या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कर पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्याचाच प्रत्यय बुधवारी रात्री सीमेवर आला. पाकिस्तानकडून बुधवारी रात्री हवाई हल्ला करण्यात आला होता. मात्र, भारतीय हवाई दलानं ‘एस-४०० सुदर्शन चक्र’ बुधवारी रात्री डागलं असून पाकिस्तानची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली आहेत.