Operation Sindoor Update : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर भारताने मोठी कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, ७ ते १० मे या कालावधीत नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरात किमान ३५ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाले अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे. आज (११ मे) भारतीय डीजीएमओच्या (DGMO) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजीव घई यांनी ही माहिती दिली.
राजीव घई यांनी म्हटलं की, “पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या हवाई घुसखोरीला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. नियंत्रण रेषेवर झालेल्या कारवाईनंतर परिणाम निश्चित करण्याचे अनेक मार्ग आहेत. नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ ते ४० पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाले आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या पायाभूत सुविधांवर देखील हल्ले करण्याचा प्रयत्न झाला”, असंही त्यांनी सांगितलं.
“आमचं लक्ष्य दहशतवाद विरोधी केंद्रित होतं. तसेच त्यानंतर त्यांनी आमच्या पायाभूत सुविधांवर हवाई घुसखोरी आणि हवाई कारवाया केल्या असत्या तर आम्ही देखील जड शस्त्रे वापरली असती. मग त्यामध्ये त्यांची मोठी जीवितहानी झाली असती. त्याचं मूल्यांकन अजूनही केलं जात आहे. काही हवाई क्षेत्रे आणि डंपवर हवेतून वारंवार हल्ले झाले. मात्र, सशस्त्र दलांनी त्यांना रोखलं आहे”, असंही राजीव घई यांनी सांगितलं.
ऑपरेशन सिंदूर नेमकं काय आहे?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहिम राबवली होती. या मोहिमेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले एअर स्ट्राइक करण्यात आला. या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लक्ष्य करत हे ऑपरेशन चालवण्यात आले.