Operation Sindoor : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. एवढंच नाही तर त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी ताकदीची झलक पाहायला मिळाली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील लष्करी कारवाईचे काही व्हिडीओ याआधी भारतीय सैन्यांकडून शेअर देखील करण्यात आले होते. त्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवलं आणि दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त केलं याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आता भारतीय सैन्यांकडून ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक नवा व्हिडीओ एक्स हँडलवरून (ट्विटर) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘तो सूड नव्हता, तर न्याय होता’, असं या व्हिडीओत भारतीय जवान म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, लष्कराच्या वेस्टर्न कमांड एक्स हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ७ मे आणि त्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान भारताने पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला होता. त्या संदर्भातील माहिती या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. या मध्ये एक जवान असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे की, “हे (ऑपरेशन सिंदूर) पहलगाम दहशतवादी हल्यानंतर सुरू झाले. मात्र, हा सूड नव्हता, तर न्याय होता. तसेत आता भविष्यात देखील लक्षात ठेवलं जाईल असा धडा शिकवण्याचा हा संकल्प होता”, असं एका जवानाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
#StrongAndCapable#OpSindoor
— Western Command – Indian Army (@westerncomd_IA) May 18, 2025
Planned, trained & executed.
Justice served.@adgpi@prodefencechan1 pic.twitter.com/Hx42p0nnon
ऑपरेशन सिंदूर काय आहे?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहीम राबवली होती. या मोहिमेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लक्ष्य करत हे ऑपरेशन चालवण्यात आलं.
ऑपरेशन सिंदूरने काय साध्य केलं?
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून काय साध्य केले, या संदर्भातील सविस्तर माहिती ११ मे रोजी भारतीय डीजीएमओच्या (डीजीएमओ) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दिली. “ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले, त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य झाले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य झाले का? असे आपण विचारल्यास याचे उत्तर हो असे आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत”, असे एअर मार्शल ए.के.भारती यांनी सांगितलं होतं.