‘दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट’ आयोजित Sydney Dialogue या तीन दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली. या परिषदेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीने आणि भाषणाने झाली. भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल, सुरु असलेल्या बदलांबाबत तसंच सायबर तंत्रज्ञाशी संबंधित आव्हानांबाबत मोदी यांनी भाष्य केलं.

“क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे, परस्पर सहकार्य केले पाहिजे, या गोष्टींचा गैरवापर होणार नाही, या आभासी चलनामुळे युवा पिढी बिघडणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे “, असं मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. डिजिटल क्रांतीमुळे आपण एक मोठं स्थित्यंतर अनुभवत आहोत. यामुळे राजकारण, अर्थव्यवस्था, समाज याची पुर्नमांडणी होत आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे सार्वभौमत्व, शासन, नैतिकता, कायदा, हक्क, सुरक्षा यावर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत असं मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील डिजिटल क्रांतीचा आणि त्यामुळे होत असलेल्या ५ प्रमुख बदलांचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला. देशात आम्ही ६ लाख गावे ही फायबर केबलने जोडत आहोत. आरोग्य सेतू आणि कोविन अँप यांचा वापर करत आम्ही ११० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा शासन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात करत आहोत. आरोग्यापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत तसं उद्योग आणि सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल हे डिजिटल क्रांतीमुळे होत आहेत, केले जात आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, भविष्यातील दूरसंचार क्षेत्र जसं की 5G आणि 6G या सर्वांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या भाषणात दिली.