जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ITBP अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या ३७ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण ३९ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे जवान होते. या दुर्घटनेत ६ जवान शहीद झाले आहेत.

अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून हे सगळे जवान पहलगामच्या दिशेने येत होते. एका बसमध्ये ३७ जवान प्रवास करत होते. त्यांच्यासोबत २ रहिवासी देखील होते. पहलगाममध्ये बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ही बस नदीपात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाले आहेत. त्यांच्यासोबत इतरही अनेक जवान जखमी झाले असून त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे.

जखमींना तातडीने उपचारांसाठी श्रीनगरला नेण्यात आलं.