Jagdeep Dhankhar Resigns : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खरं तर धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जगदीप धनखड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना राजीनामा द्यायला लावला? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

जगदीप धनखड यांनी राजीनाम्याबाबत सांगितलेलं कारणही अनेकांना पटलेलं नाही. त्यांच्या राजीनाम्याची वेळ पाहून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार? कोणाला उपराष्ट्रपती पदाची संधी मिळणार? तसेच पुढील उपराष्ट्रपतींची निवड कधी होणार? आणि एनडीएतील मित्रपक्षांना उपराष्ट्रपती पदाची संधी मिळणार का? या संदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एनडीएतील मित्रपक्षांना उपराष्ट्रपती पदाची संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या निवडीबाबत एनडीएची बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितलं की, लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं संख्याबळ पाहता उपराष्ट्रपती पदासाठी असा उमेदवार असेल की जो निष्ठावान असेल. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाईल.

दरम्यान, भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “एनडीएच्या प्रमुख घटकांपैकी विशेषतः टीडीपी किंवा जेडी(यू) मधून एखाद्या सदस्याची निवड होण्याची शक्यता मानली जात आहे. कारण अशा प्रकारच्या निर्णयामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील संबंध अधिक मजबूत होतील.” तसेच आणखी एका सूत्रानं सांगितलं की उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अशा वेळी होत आहे जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण फेरबदल अपेक्षित आहेत. पक्षातील सूत्रांच्या मते राज्यसभेचा कार्यकाळ संपण्याच्या दिशेने वाटचाल करणारे भाजपा खासदार आणि पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त राज्यमंत्री या फेरबदलांचा भाग असण्याची शक्यता आहे.

२०२२ मध्ये धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून झाली होती नियुक्ती

जुलै २०२२ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) जगदीप धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीनं त्यांच्याविरोधात मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली होती. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी ७१० वैध मतांपैकी ५२८ मते मिळवीत (७४.४%) दणदणीत विजय मिळवला. अलीकडच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमधील हा सर्वाधिक मताधिक्याने मिळवलेला विजय ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगदीप धनखड यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं?

२१ जुलै २०२५ रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. “प्रकृतीची प्राधान्यानं काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला देण्यात आल्यानं मी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. राज्यघटनेच्या कलम ६७ (अ)अंतर्गत मी स्वेच्छेनं हा निर्णय घेतला आहे,” असं त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. मात्र, त्यांनी आरोग्य स्थितीबाबत कोणतीही विशिष्ट माहिती उघड केलेली नाही. धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी आणि खासदारांचे आभार मानले, तसेच आपल्या कार्यकाळात लाभलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.