S. Jaishankar On POK: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्युत्तरनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरवरच होईल. यामध्ये दोन्ही देशांमधील चर्चेत कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे विधान केले.
डॉ. एस. जयशंकर पुढे बोलताना म्हणाले की, “पाकिस्तानशी आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. हे वर्षानुवर्षे राष्ट्रीय एकमत आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.”
काश्मीरवर चर्चा करण्यासाखी एकमेव गोष्ट म्हणजे…
यावेळी सिंधू जल कराराबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, “सिंधू जल करार स्थगित आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत तो स्थगित राहील. काश्मीरवर चर्चा करण्यासाखी एकमेव गोष्ट म्हणजे, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणे ही आहे. आम्ही त्या चर्चेसाठी कायम तयार आहोत.”
पाकिस्तानी लष्कराकडे हस्तक्षेप न करण्याचा पर्याय होता
भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितले की, “दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करून आम्ही ठरवलेले उद्दिष्ट साध्य केले आहे. मला वाटते की, आम्ही योग्य भूमिका घेतली, कारण ऑपरेशनच्या सुरुवातीलाच, आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता की आम्ही लष्करावर नव्हे तर दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करत आहोत. पाकिस्तानी लष्कराकडे यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा पर्याय होता. त्यांनी तो चांगला सल्ला न ऐकण्याचा निर्णय घेतला. याचा १० मे रोजी सकाळी त्यांना जोरदार फटका बसला. उपग्रह छायाचित्रांवरून दिसून येते की आपण त्यांचे किती नुकसान केले आणि त्यांनी किती. यावरून शस्त्रविराम करण्याची कोणाची इच्छा होती हे स्पष्ट होते.”