भारतात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची साक्ष असणाऱ्या आणि भारताच्या इतिहासातील एक दुःखद घटना जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. ही घटना घडली त्यावेळी जनरल डायरने निरपराध जनतेवर बेछूट गोळीबाराचे आदेश आपल्या सैन्याला दिले होते. या घटनेची ब्रिटन सरकारने औपचारिकरित्या दोन दिवसांपूर्वीच माफी मागितली आहे. दरम्यान, आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनी अमृतसर येथील जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट दिली आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील येथे उपस्थिती लावून श्रद्धांजली वाहिली.


जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅफ्टन अमरिंदर सिंग आदी उपस्थिती लावली आणि श्रद्धाजली वाहिली. यावेळी विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.


अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. दरम्यान, ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने या बागेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या शस्त्रधारी सैनिकांना तैनात करीत घेराबंदी केली होती. त्यानंतर त्याने कुठलाही इशारा न देता आपल्या सैन्याला लोकांवर १० मिनिटे गोळीबार करण्याचे आदेश दिले. या घटनेत १००० लोकांचा मृत्यू झाला होता. तर १५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. मात्र, ब्रिटश सरकार यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या केवळ ३७९ इतकी तर जखमींची संख्या १२०० इतकी सांगत आहे.