दगडफेक करणारे युवक देशद्रोही असून त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत अथवा चांगला चोप दिला पाहिजे, असे विधान जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्याने केल्याने मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भाजप-पीडीपी सरकारमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. दगडफेक करणाऱ्यांना उद्देशून, लातों के भूत बातों से नही मानते, असे वक्तव्यही या मंत्र्याने केले आहे.
जम्मू-काश्मीरचे उद्योगमंत्री चंद्रप्रकाश गंगा यांनी वरील वक्तव्य केले असून त्याला भाजपच्या दोन मंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र पीडीपीने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्र्यांचे तिरस्कारयुक्त वक्तव्य आणि काश्मिरी युवकांमध्ये दहशत पसरविणारे वक्तव्य हे ज्येष्ठ मंत्र्यांसाठी केवळ अशोभनीयच नाही तर धोकादायकही आहे, असे पीडीपीने म्हटले आहे.
सांबा जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील रामगड शहरात एका सार्वजनिक सभेनंतर गंगा यांचे रेकॉर्ड केलेले वक्तव्य गुरुवारी उघड झाले. गंगा यांनी युवकांना सुरक्षारक्षक मारहाण करीत असल्याच्या व्हिडीओचा संदर्भ दिला. गंगा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर दोन दिवसांनी ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते. भाजपचे मुख्य प्रवक्ते सुनील सेठी यांनी गंगा यांच्या मताशी असहमती दर्शविली, ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. गोळ्या हा पर्याय नाही, आपल्या जिवाला धोका असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानंतर तो अखेरचा पर्याय आहे, असे सेठी म्हणाले.