पीटीआय, सिताब दियारा : ‘‘स्वत:ला जयप्रकाश नारायण यांचे ‘अनुयायी’ म्हणवणारे त्यांच्या समाजवादी विचारधारेला तिलांजली देऊन, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत,’’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केली. बिहारमधील महाआघाडी सरकारला त्यांनी यानिमित्ताने टीकेचे लक्ष्य केले.

बिहारमधील सरन जिल्ह्यातील सिताब दियारा हे आणीबाणीविरोधी आंदोलनाचे जननायक जयप्रकाश नारायण यांचे जन्मगाव आहे. जयप्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. ‘जेपी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या या समाजवादी नेत्याच्या १५ फूट उंच पुतळय़ाचे अनावरण शहा यांनी केले. ‘लाला का टोला’ येथील ‘जेपीं’च्या वडिलोपार्जित घराच्या अंगणात शहा यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर सभेस संबोधित करताना शहा बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले.

शहा म्हणाले, की ‘जेपी’ हे सत्तेसाठी नव्हे तर आपली श्रद्धा असलेल्या विचारधारेसाठी आयुष्यभर लढले. मात्र, त्यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी सत्तेसाठी पाच वेळा आपली भूमिका बदलून सोयीस्कर युती-आघाडी केली. ‘जेपीं’नी आयुष्यभर ज्या काँग्रेसशी संघर्ष केला, त्यांचे ‘अनुयायी’ सध्या त्याच काँग्रेसच्या गोटात जाऊन बसले आहेत. ते सत्तालोलुप आहेत. त्यामुळे त्यांना ‘जेपीं’च्या विचारधारेशी काही देणेघेणे नाही. ‘जेपीं’ना अपेक्षित तळागाळातील दीनदुबळय़ांच्या उन्नयनासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सदैव झटत आहेत, असे सांगून शहा म्हणाले, की त्यामुळेच केंद्राने अंत्योदय, उज्ज्वला आदी अनेक योजना सुरू केल्या.

कुणीही आले, तरी फरक नाही : नितीशकुमार

पाटणा : ज्येष्ठ समाजवादी नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिताब दियारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले, की कुणीही आले काय नि गेले काय, मला काही फरक पडत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजवादी पक्षाचे महान नेते जयप्रकाश नारायण यांना अभिवादन करणाऱ्या सोहळय़ास उपस्थित राहण्यासाठी आपण उद्या नागालँडला जाणार आहोत. येथे १९६० च्या दशकात जयप्रकाश यांनी तीन वर्षे व्यतीत केली होती. अमित शहा यांनी सिताब दियाराच्या निमित्ताने बिहारमध्ये मंगळवारी केलेला दौरा हा महिन्याभरातील दुसरा बिहार दौरा आहे. भाजपचे मुख्य निवडणूक व्यूहरचनाकार असलेल्या शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दर महिन्याला बिहार दौरा करण्याचे आश्वासन दिले आहे.