अरुणाचल प्रदेशमधील मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या पाठिंब्याने काँग्रेस बंडखोरांचे सरकार स्थापनेला अरुणाचलचे राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांनी दिलेले सर्व आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी घटना बाह्य ठरवले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाबाम तुकी पुन्हा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने व्यावसायिकांना हाताशी घेवून सरकार पाडल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी अरुणाचलचे राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बंडखोरी नेत्यांना हाताशी घेऊन सरकार पाजण्याचे कारस्थाना करणाऱ्या भाजपने काँग्रेसची माफी मागावी असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.केले. यापूर्वी उत्तराखंडमध्ये देखील भाजपने हरीश रावत यांच्या सरकारला अल्पमतात आणले होते. राष्ट्रपती राजवट लागू करुन उत्तराखंडमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा केंद्राचा प्रयत्न यापूर्वी अपयशी ठरला होता. दरम्यान, केंद्र सरकार आपल्या मर्जीतील राज्यपालांची निवड करुन सत्ता नसणाऱ्या राज्यात बंडखोरी नेत्यांच्या साथीने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे.