कर्नाटकात आता पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगण्यास सुरूवात झाली आहे. कारण, काँग्रेसच्या दोना आमदारांनी एका पाठोपाठ एक राजीनामे सादर केले आहेत. परिणामी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी बंगळुरातील आपल्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे ही सर्व राजकीय उलथापालथ सुरू असताना मुख्यमंत्री कुमारस्वामी हे परदेश दौऱ्यावर आहेत.

कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील विजयनगरचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंह यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपावताच काँग्रेसचे गोकक येथील आमदार रमेश जार्किहोली यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील आमदारांच्या गळतीला सुरूवात झाली असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणचे हे दोन्ही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात सुरू असलेल्या या उलथापालथीवर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्यामागे भाजपाचा हात असल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी म्हणाले की, मी या ठिकाणाहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, सरकारला अस्थिर बनवण्याचे भाजप दिवा स्वप्न पाहत आहे.

काँग्रेसचे आमदार रमेश जार्किहोलींवर कोट्यावधी रूपयांच्या कर्जाचा डोंगर असल्याने त्यांना राज्यातील अनेक बँकांनी दहा दिवसांच्या आत कर्ज फेडण्यासाठी नोटीस बजावली आहे. शिवाय कर्जाची रक्कम दिलेल्या मुदतीत न जमा केल्यास त्यांची संपत्ती देखील जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही बँकांनी दिला आहे.