धुवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या शंभर वर्षातील हा केरळमधील सर्वात वाईट पूर आहे असे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे. मदतकार्य जसजसे वेग घेत आहे तसतसा मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या महापूरात आतापर्यंत ३२४ लोकांचा मृत्यू झाला असून २ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी १९२४ साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळ बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ११ वाजेपर्यंत केरळला पोहोचणार असून ते राजभवनात थांबतील. शनिवारी सकाळी आठ वाजता ते केरळची हवाई पाहणी करतील. ८२,४४२ लोकांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. रेल्वेने राज्यात दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. मदतकार्यात जास्तीत जास्त हेलिकॉप्टर लावण्याची विनंती राज्याने केंद्राला केली आहे. दिल्ली सरकारकडून केरळला १० कोटींची मदत घोषित केली जाण्याची शक्यता आहे. नौदलाने आयएनएस दीपक ही युद्धनौका मुंबईहून कोचीला रवाना केली आहे. यात पिण्याचे आठ लाख लिटर पाणी आहे. १९ ऑगस्टला आयएनएस दीपक कोचीला पोहोचेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala worst flood in 100 years
First published on: 17-08-2018 at 21:48 IST