North Korea Smartphones Control: उत्तर कोरियामधील हुकूमशाह किम जोंग उन यांच्या करामती अनेकदा जगासमोर येत असतात. आताही किम जोंग उनचा असाच एक कारनामा बीबीसी वृत्तसमूहाने समोर आणला आहे. उत्तर कोरियामधील जनतेचे स्मार्टफोन आता सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचे बीबीसीने पुराव्यासह दाखवले आहे. यामुळे लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्टफोनचा खासगी वापर करता येत नाही.
२०२४ च्या अखेरीस बीबीसीने तस्करीद्वारे उत्तर कोरियातील स्मार्टफोन मिळवून त्याची तपासणी केली. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईडचे बदल केलेले व्हर्जन वापरले जाते. ज्याद्वारे फक्त स्थानिक इंटरनेटच फोनला जोडले जाऊ शकते. या इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर कोरियाच्या सरकारला जी माहिती दाखवायची आहे, तीच वापरकर्त्याला पुरविली जाते.
एवढेच नाही तर एखाद्याला फोनवर काही संदेश टाइप करायचा असेल तर सरकारला जी भाषा अपेक्षित आहे, ती आपोआप उमटली जाते. उदाहरणार्थ, एखाद्याने स्मार्टफोनवर दक्षिण कोरिया हा शब्द टाइप केल्यास तो आपोआप ‘पपेट स्टेट’ (कळसूत्री बाहुली देश) असा होतो. उत्तर कोरिया सरकारने अधिकृतपणे शेजारच्या राष्ट्राला हा शब्द दिला आहे. तसेच फोनवर “ओप्पा” असा शब्द टाइप केल्यास फोनवर सावधानतेची सूचना दिली जाते. हा शब्द फक्त भाऊ-बहिणच एकमेकांसाठी वापरू शकतात, अशी सूचना आल्यानंतर सदर शब्द ‘कॉम्रेड’ शब्दात बदलतो. ओप्पा हा शब्द दक्षिण कोरियात प्रामुख्याने मोठा भाऊ किंवा प्रियकरासाठी वापरला जातो.
दर पाच मिनिटांनी घेतला जातो स्क्रिनशॉट
सदर स्मार्टफोनचे विश्लेषण करताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या स्मार्टफोनद्वारे गुप्तपणे दर पाच मिनिटांनी स्क्रिनशॉट घेतला जातो. हे स्क्रिनशॉट एका गुप्त फोल्डरमध्ये जनत केल्या जातात. फोनच्या वापरकर्त्याला त्या दिसत नाहीत मात्र सरकारी यंत्रणा त्या पाहू शकतात. जर स्मार्टफोनशी छेडछाड झाली किंवा जर बाहेरच्या देशातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा मानला जाईल.
उत्तर कोरियाचे सरकार त्यांचा राजकीय अजेंडा रेटण्यासाठी आणि लोकांच्या संवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, यावर बीबीसीच्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. अहवालात एका तंत्रज्ञान विश्लेषकाने नमूद केले की, यातून फक्त इंटरनेटच ब्लॉक केले असे नाही तर लोकांच्या विचार करण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीवरही अंकुश आणला आहे.
१९५३ मध्ये कोरियन युद्ध संपल्यानंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाने कोणताही शांतता करार न करता शत्रुत्व कायम ठेवले. यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अशा क्लुप्त्यांचा वापर केला जातो. मात्र उत्तर कोरियाने आता यात स्वतःच्या जनतेच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला आहे.