राजदचे सर्वेसर्वा आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात ते दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रिम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत राजदला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, या निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे त्यांनी अन्यत्याग केल्याचे म्हटले जात आहे. राजदने बिहारमध्ये काँग्रेस आणि रालोसपा यांच्याबरोबर महागठबंधन केले होते.
लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला असून त्यांची दिनचर्याही नियमित सुरू नाही. ते ताणावात किंवा कोणत्या चिंतेत असावेत, अशी शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीतील लाजिरवाणा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याच्या शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, औषधे देण्यासाठी त्यांनी वेळेवर जेवण घेतले पाहिजे, असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात आला असून सध्या डॉक्टर त्यांचे समुपदेशन करत आहेत.
लालू प्रसाद यादव हे कोणत्याही तणावाखाली नसल्याचे राजद नेत्याकडून सांगण्यात आले. तसेच लालू प्रसाद यादव यांची ही पहिली निवडणूक नसून पराजयामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यांनी सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत राजदला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. बिहारमध्ये राजदला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांपैकी रालोआने 39 जागांवर विजय मिळवत सर्वांना धुळ चारली. तर महागठबंधनला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. राजदने पहिल्यांदाच लालू प्रसाद यांच्या अनुपस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. परंतु निकालानंतर बिहारच्या जनतेने या नव्या नेतृत्वाला नाकारल्याचे दिसत आहे.