माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. नवाब मलिक यांनी जामीन मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या प्रकरणात आधी बॉम्बे हायकोर्ट सुनावणी करणार आहे, ते न्यायालय काय निर्णय घेणार त्याची वाट पाहा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत जामीन मिळावा म्हणून नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना कुठलाही दिलासा कोर्टाने दिलेला नाही.
नवाब मलिक यांनी याचिकेत काय म्हटलं आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोग्याचं कारण देत सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली. माझी एक किडनी खराब आहे. तसंच दुसरी किडनीही कमी प्रमाणात कार्यरत आहे. एक तपासणीची संमती घेण्यासाठी न्यायालय दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी घेतं. त्यामुळे मला जामीन मिळावा असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस एमएम सुंदरेश यांच्या पीठाने याविषयीचा निर्णय दिला आहे. मलिक यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली.
नवाब मलिक यांच्यावर आरोप काय आहेत?
मुंबईतल्या कुर्ला या ठिकाणी गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा आहे. ही जागा मुनिरा प्लंबर यांची होती. मुनिरा यांनी आपली जागा हडपण्यात आल्याची तक्रार मलिक यांच्या विरोधात केली आहे. नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत मिळून ही जागा हडपली, असा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले, त्यानंतर त्यांनी टेरर फंडिंगही केलं असेही आरोप करण्यात आले आहेत. हे दोन मुख्य आरोप त्यांच्यावर आहेत.
याच आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात चार्जशिटही दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये मनी लाँड्रिग प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी पैसे हसीना पारकर, सलीम फ्रूट आणि सरदार शहावली खान यांना कॅश आणि चेकच्या स्वरूपात पैसे दिले होते हा उल्लेख करण्यात आला आहे.