भुवनेश्वर : ओडिशात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आघाडीबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप ओडिशात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी ही घोषणा केली. गेले काही दिवस ओडिशातील सत्ताधारी बिजु जनता दल (बीजेडी) आणि विरोधी भाजपत निवडणूक पूर्व युतीची चर्चा सुरू होती. तिला आता पूर्णविराम मिळाला आहे.

ओडिशातील सर्व २१ लोकसभेच्या आणि १४७ विधानसभेच्या जागांवर भाजप स्वबळावर लढेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साडेचार कोटी ओडियांच्या आकांक्षा साकारण्यासाठी तसेच विकसित भारत आणि विकसित ओडिशासाठी भाजप काम करेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी एक्सवर म्हटले आहे.

हेही वाचा >>> ४१ कंपन्यांकडून भाजपला २,४७१ कोटी; सामाजिक कार्यकर्त्यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा

सामल यांनी पुढे एक्सवर लिहिले की गेली १० वर्षे नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील बीजेडी केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर समर्थन देत आली आहे, त्यासाठी पक्षाचे आभार. देशात जिथे डबल इंजिन सरकार आहे , तेथे विकास आणि गरीबांच्या कल्याणकारी कामांना वेग मिळाला आणि राज्यात प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाल्याचा अनुभव आहे. पण आज ओडिशात मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना तळापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे तेथील गरीबांना त्यांचा लाभ मिळत नाही. ओडिशा-अस्मिता, ओडिशा-गौरव आणि ओडिशाच्या लोकांच्या हिताच्या अनेक विषयांची आम्हाला चिंता आहे.

बिजु जनता दल आणि भाजपमध्ये १९९८ ते २००९ अशी ११ वर्षे युती होती. दोन्ही पक्षांनी तीन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुका एकत्रित लढवल्या होत्या. २००९ मध्ये ही युती तुटली. २०१२, २०१७ आणि २०२२ मध्ये बीजेडीने रालोआच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना समर्थन दिले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांतील मतभेद दूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण दोन्ही पक्षांतील युतीच्या चर्चाना आता विराम मिळाला आहे.

खासदार महताब यांचा बीजेडीला रामराम

बिजु जनता दलाचे ज्येष्ठ खासदार आणि पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले भर्तृहरी महताब यांनी शुक्रवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. महताब यांनी सलग सहा वेळा कटक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. बीजेडीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे आपण राजीनामा सुपूर्द केल्याचे महताब यांनी सांगितले. संसदेतील उत्कृष्ट वादविवादासाठी त्यांना 2017 ते 2020 अशी सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.