Crime News : मध्यप्रदेशचे भाजपा आमदार अंबरीश शर्मा यांनी एका तरुणाला गुंडांच्या तावडीतून वाचवल्याचा प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील लहार येथे एका तरुणाला काही काठ्या हातात घेतलेल्या आणि तोंड झाकलेल्या गुंडांनी घेरलं होतं. हे गुंड त्या तरूणाला मारहाण करणार इतक्यात अचानक जवळून जात असलेल्या भाजपा आमदाराची गाडी त्या ठिकाणी थांबली आणि त्यामधून हातात रायफल घेतलेले शर्मा खाली उतरले. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं झालं काय?
लहार येथील रहिवासी असलेले युवराज सिंह राजावत हे गुरुवारी त्यांच्या कुटुंबासह भिंड शहरात जात होते. त्यांच्या गाडीला सानी मोड येथे एका वाहनाने ओव्हरटेक केलं आणि त्यांना त्यांची गाडी थांबायला भाग पाडण्यात आलं.
हातात काठ्या घेतलेल्या आणि तोंडं झाकलेल्या एक टोळी गाडीतून खाली उतरली आणि त्यांनी युवराज यांना वाहनातून बाहेर खेचलं. त्यांनी शिवीगाळ सुरू केली आणि हाणामारीला सुरूवात होणार इतक्यात जवळून जात असलेले लहारचे आमदार अंबरीश शर्मा यांनी त्यांच्या चालकाला गाडी तेथे थांबवायला सांगितली
आमदार शर्मा गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या माणसांचा जाब विचारला आणि गाडीतून खाली उतरतानाच शर्मा हे हातात रायफल घेऊन उतरले. त्यांना पाहून गुंडांनी त्यांच्या गाडीकडे धूम ठोकली आणि ते तेथून पळून गेले.
शर्मा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की , “ती माझी रायफल होती, मी बऱ्याचदा ती बरोबर घेऊन प्रवास करतो. माझ्या मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. पूर्वी येथे गुन्हेगारीच्या घटना घडत असत कारण हा मतदारसंघ उत्तर प्रदेशला लागून आहे आणि आता गुन्हेगारीची परिस्थिती खूपच सुधारली आहे.”
शर्मा हे २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन लाहारचे आमदार बनले, त्यांनी काँग्रेसचे सात वेळा आमदार राहिलेले गोविंद सिंह यांचा ११,३७९ मतांनी पराभव केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजावत यांच्याकडे पैसे थकले असल्याने ते तोंड छाकून घातलेले लोक त्यांच्या मागे लागले होते. जानेवारी २०२५ मध्येही टोळक्याने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप राजावत यांनी केला.