Nilamben महात्मा गांधींची पणती नीलमबेन पारिख यांचं गुजरातमधल्या नवसारी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी निधन झालं आहे. नीलमबेन ९२ वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातल्या मतभेदांवर नीलमबेन पारिख यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

नीलमबेन यांनी समाजसेवेसाठी वेचलं आयुष्य

दक्षिणपथ आदिवासी महिलांच्या उद्धारासाठी नीलमबेन यांनी त्यांचं आयुष्य वेचलं. या आदिवासी महिलांना स्वावलंबन शिकवणं, शिक्षण देणं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम नीलमबेन यांनी केलं. हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच मुलं होती. त्यापैकी रामीबेन यांची कन्या म्हणजे नीलमबेन. नीलमबेन या त्यांच्या खादीवरील निष्ठेसाठीही ओळखल्या जात होत्या त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं अशी माहिती नीलमबेन यांचे चिरंजीव डॉ. समीर पारिख यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

समीर पारिख यांनी काय सांगितलं?

माझ्या आईला (नीलमबेन) कुठलाही आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे तिने जेवण जवळपास सोडून दिलं होतं. तिला ऑस्टिओपोरोसिस होता. त्यामुळे तिची हाडं ठिसूळ झाली होती. या एका कारणासाठी मी रुग्णालयात तिला न नेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मी तिच्याजवळ बसून होतो. तिच्या नाडीचे ठोके हळूहळू मंदावले, त्यानंतर हळूहळू कुठलीही वेदना किंवा त्रास न होता तिने प्राण सोडले. माझ्या आईचं निधन अत्यंत शांततेत झालं. वेदना न होता तिला मृत्यू आला अशी माहिती समीर पारेख यांनी दिली. आमच्यावर गांधी विचारधारा आमच्या आईने कधीही लादली नाही. मात्र तिचं आयुष्य पाहून आम्ही सगळेच प्रभावित झालो होतो. अशीही माहिती समीर पारिख यांनी दिली.

माझ्या आई वडिलांनी १९५५ मध्ये मुंबई सोडली-समीर पारिख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझे आई-वडील म्हणजेच नीलमबेन आणि योगेंदरभाई यांनी १९५५ मध्ये मुंबई सोडली. माझ्या आईने पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत घेतलं होतं. त्यानंतर या दोघांनीही ग्रामीण भागात आपण आयुष्य घालवलं पाहिजे असा निर्णय घेतला. सौराष्ट्रातील ग्रामीण भागात ते दोघंही सुरुवातीला राहिले. त्यावेळी त्यांनी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता. काही महिने ओडिशातील गावातही त्यांनी वास्तव्य केलं. त्यानंतर १९६२ मध्ये माझे आई वडील हे गुजरातमध्ये आले. त्यानंतर माझ्या आईने (नीलमबेन) तापी जिल्ह्यातील एका गावात शाळा सुरु केली. दक्षिणपथा आदिवासी समाजातील महिलांसाठी कार्य यानंतरच आईने सुरु केलं. असंही समीर पारिख यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.