UP Man Fights with Leopard Video VIral : लखीमपूर खेरी भागात मानव व वन्यजीवांमधील संघर्षाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, बिबट्या व माणसांमधील संघर्षाचं चित्रण करणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. धौरहरा फॉरेस्ट रेंजमधील बबुरी येथील एका वीट भट्टीत बिबट्या शिरला आणि त्याने तिथल्या एका कामगारावर हल्ला केला. मात्र, ज्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला त्याने न घाबरता बिबट्याचा सामना केला. या तरुणाने एकट्याने या बिबट्याशी झुंज दिली आणि स्वतःचा बचाव केला. बिबट्याच्या हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे. मात्र, स्वतःचा जीव वाचवण्यात तो यशस्वी ठरला.

या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक तरुणाच्या हिमतीचं कौतुक करत आहेत. कारण कोणत्याही शस्त्राशिवाय त्याने बिबट्याशी दोन हात केले. दुसऱ्या बाजूला मानव व वन्यजीवांमधील संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच लखीमपूर व आसपासच्या भागातील जगंलतोडीच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विद्यमान भाजपा सरकारवर टीका केली आहे.

तरुणाची बिबट्याशी झुंज

तरुण आणि बिबट्याची झुंज पाहून वीट भट्टीत काम करणारे इतर मजूर व आसपासचे लोक तिथे जमा झाले. सर्वजण केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. कोणीही पुढे जाऊन त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. काही तरुण दूर उभे राहून बिबट्याला दगड मारत होते. तर काहीजण वीटांचा मारा करून बिबट्याला तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचा बिबट्यावर फारसा परिणाम झाला नाही. तरुणाने बराच वेळ झुंज दिल्यानंतर बिबट्या तिथून निघून गेला. मात्र, तोवर हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर वीट भट्टीतील इतर मजुरांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.

उत्तर प्रदेशात बिबट्यांचे वाढते हल्ले

अलीकडेच उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील मोहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. हिमांशू, राममिलन, नावेद व पप्पू अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जणांची नावं असून हे चारही जण अद्याप रुग्णालयात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखिलेश यादव यांची टीका

या घटनेचा व्हिडीओ शेअर करत अखिलेश यादव यांनी तरुणावर चांगले उपचार करण्याची मागणी केली आहे. भाजपा सरकारच्या काळात वनं लुटली जात आहेत. जंगलांमध्ये अतिक्रमणं होत आहेत. परिणामी प्राण्यांसाठी जंगलंच राहिली नाहीत. त्यामुळे हे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये जाऊन हल्ले करत आहेत.