‘अफ्स्पा’च्या विरोधात सोळा वर्ष उपोषण करणा-या इरोम शर्मिला यांचा दारूण पराभव झाला. मणिपूर विधानसभेसाठी त्या थौबलमधून मुख्यमंत्री इबोबी यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. इबोबींचा पराभव करूनच दाखवू असा निश्चय त्यांनी केला होता, पण मणिपूरी जनतेने मात्र शर्मिला यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यांना फक्त ८६ मते पडली. तर इबोबी हे १८ हजार ६४९ मते मिळून विजयी झाले. त्यामुळे दारूण पराभव झालेल्या इरोम शर्मिला यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे.

पराभवानंतर इरोम पूर्णपणे भावूक झाल्या. ‘अफ्स्पा’ हटवण्यासाठी जिने १६ वर्ष उपोषण केले तिला थौबलमधून फक्त ८६ मते पडली. निवडणुकांचे निकाल हाती येण्यापूर्वीच ही निवडणुक पैसा आण बळाच्या जोरावर लढली गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. मणिपूरमधील ‘अफ्स्पा’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने ८ जुलै रोजी दिलेल्या निकालानंतर महिन्याभरानं इरोम शर्मिलानं उपोषण सोडलं. त्यानंतर त्यांनी पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स पक्षाची स्थापना केली. हा पक्ष ६० पैकी ६ जागा लढवत होता.

गेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. इबोबी हे सलग तिस-यांदा मुख्यमंत्री झाले होते. ७ मार्च २००२ मध्ये ते इबोबी मुख्यमंत्री झाले होते. मणिपूरमध्ये मेतई समाजाचा दबदबा आहे, राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ६३ टक्के जनता ही मेतई समाजाची आहे, इबोबी हे देखील मेतई समाजाचे आहे त्यामुळे याचाच फायदा इबोबींना झाल्याचे म्हटले जाते.