Monsoon arrives in Kerala 2025 : पावसाची वाट पहाणार्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केरळमध्ये आज मान्सूनचे आगमन त्याच्या नेहमीच्या १ जूनच्या तारखेपेक्षा आठ दिवस आधीच झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे. गेल्या १६ वर्षात मान्सूनचे हे सर्वात लवकर झालेले आगमन झाले आहे.
राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल अशी सर्व परिस्थिती तयार झाली होती. कमी दाबाचा प्रदेश आणि मान्सून प्रणालीची प्रवास यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
यापूर्वी अशा प्रकारे वेळापत्रकाच्या आधीच मान्सूनचे आगमन हे २००९ आणि २००१ साली झाले होते. यावर्षी मे महिन्यात २३ तारखेला मान्सून आला होता.
सामान्यपणे केरळमध्ये मान्सून हा १ जून रोजी दाखल होतो. आजवर सर्वात लवकर आलेला मान्सून हा १९१८ साली ११ मे रोजी आला होता. तर सर्वात उशीरा मान्सून दाखल होण्याची तारीख ही १९७२ सालची आहे, या वर्षी पावासाला १८ जून रोजी सुरूवात झाली होती.
गेल्या २५ वर्षांमध्ये मान्सूनला सर्वाधिक उशीर हा २०१६ साली झाला होता, या वर्षी मान्सून केरळमध्ये ९ जून रोजी दाखल झाला होता.
दक्षिण भारतात पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून देशाच्या दक्षिणेकडील राज्यात केरळमध्ये याबरोबरच किनारीभाग आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भाग यासह कोकण आणि गोवा येथेही शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात २९ मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून वारे देखील ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहतील असे सांगण्यात आले आहे. तसेच पुढील पाच दिवसांत तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही काही ठिकाणी पाऊस आणि विजांच्या गडगडाट पाहायला मिळेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील वातावरण कसे असेल?
दक्षिण कोकण किनाऱ्याजवळ पूर्व-मध्य अरेबियन समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जो २४ मे रोजी रत्नागिरीपासून वायव्येला ४० किमी अंतरावर होता. मात्र तो पूर्वेकडे सरकेल आणि आज सकाळी रत्नागिरी आणि दापोली यांच्यादरम्यानचा किनारा ओलांडेल अशी अपेक्षा होती.
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी दुपारी महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला होता. मुंबईत विजांसह गडगडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.