मुंबईतून नवजात बालक व महिलेसह पाच जण आयसिस या दहशतवादी संघटनेत दाखल होण्यासाठी जून महिन्यात भारत सोडून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. अश्फाक अहमद (वय २६) व त्याची पत्नी, भाचा मोहम्मद सिराज (वय २२) आणि एजाज रहमान (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहेत.
आपण आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलो असून पुन्हा परतणार नसल्याचे अश्फाकने त्याच्या लहान भावाला पाठवलेल्या संदेशात म्हटले. आई-वडीलांची काळजी घेण्याचेही त्यात म्हटले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा संदेश मिळाला होता. अश्फाकचे वडील अब्दुल माजीद यांनी सहा ऑगस्ट रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यात हनीफ, केरळचा एका शिक्षक अब्दूर रशीद, नवी मुंबईत राहणारा अरशी कुरेशी आणि कल्याणचा रिझवान खान यांचा उल्लेख आहे. या सर्वांनी अश्फाकला आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अब्दूर रशीदही सिरियात गेला आहे.
अश्फाकने आपल्या पत्नीला इच्छेने नेले की जबरदस्तीने याची माहिती समजू शकलेली नाही. अश्फाकला एक बहीण व भाऊ आहे. त्याने २०१४ पासून गाणे ऐकणे, टीव्ही पाहणे बंद केल्याचे माजीद यांनी पोलिसांना सांगितले. एकाच कुटुंबातील चार लोक दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याने मुंबई पोलीसही हैराण झाले आहेत. धर्म उपदेशक मोहम्मद हनिफ याची चौकशी करण्यात येत असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. मुंबईमध्ये माजीद यांच्या मालकीची काही अतिथीगृहे आहेत.
जगभरात आयसिसचा प्रभाव वाढत असतानाच मराठवाड्यातील सुमारे १०० मुस्लिम युवक बेपत्ता असून ते आयसिसमध्ये दाखल झाल्याचा संशय शिवसेनेचे परभणीचे आमदार राहूल पाटील यांनी नुकताच विधानसभेत व्यक्त केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 5 people left india to join islamic state
First published on: 21-08-2016 at 16:14 IST