नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरून ब्रेक लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुलेट ट्रेनला फायद्यात चालवायचे असेल तर भारतीय व्यवस्थापन संस्थेने (आयआयएम) काही पर्याय अहवालाद्वारे रेल्वेसमोर ठेवले आहेत. हे पर्याय पाहता बुलेट ट्रेन रूळांवरून धावणे कितपत व्यवहार्य ठरेल, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अहवालानुसार रेल्वेला बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला किमान ८८ हजार प्रवासी वाहून न्यावे लागतील अथवा बुलेट ट्रेनने दिवसाला १०० फेऱ्या मारल्या पाहिजेत. ‘डेडिकेटेड हायस्पीड रेल्वे नेटवर्कस इन इंडिया: इश्यूज इन डेव्हलपमेंट’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षांनी तिकीटाचा दर १५०० रूपये इतका ठेवण्यात आला आणि दिवसाला या ट्रेनने ८८००० ते १,१०,००० जणांनी प्रवास केला तरच या प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडता येऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी जपानकडून भारताला सवलतीच्या दरात ९७, ६३६ कोटी इतके कर्ज मिळाले आहे. भारताला हे कर्ज ५० वर्षात फेडायचे असून प्रकल्प पूर्ण होऊन १५ वर्ष झाल्यानंतर ०.१ टक्के व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ahmedabad bullet train will need to make 100 trips a day to be viable iim study
First published on: 18-04-2016 at 11:32 IST