पीटीआय, शिलाँग/लखनऊ
मेघालयात मधुचंद्रासाठी गेलेल्या नवदाम्पत्यापैकी तरुणाची हत्या त्याच्या पत्नीने सुपारी देऊन केल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर ही महिला शरण आली. या प्रकरणी तिच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी २१ वर्षीय तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.
इंदूरमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा ११ मे रोजी विवाह झाला. त्यानंतर २० मे रोजी मधुचंद्रासाठी हे नवदाम्पत्य मेघालयात गेले. २४ मेपर्यंत दोघेही कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र त्यानंतर संपर्क न झाल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
२ जून रोजी खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात एका दरीत राजाचा मृतदेह आढळला. मात्र सोनम बेपत्ता असल्याने तिच्याविषयी संशय बळावला. सोनमने काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी मध्य प्रदेशातून तिघांना आणि उत्तर प्रदेशातून एकाला अटक केली. अटक केलेल्या तिघांनी या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीकडून मिळाल्याचे पोलिसांना सांगितले.