पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ फेब्रुवारी) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरच्या अभार प्रस्तावावेळी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले, काँग्रेसच्या काळात आपल्या देशाने आणि अर्थव्यवस्थेने किती प्रगती केली? त्यांनी आपली अर्थव्यवस्था १२ व्या नंबरवरून ११ व्या नंबरवर आणली. परंतु, आम्ही ती पाचव्या क्रमांकावर आणली आणि आता तेच काँग्रेसवाले आम्हाला अर्थव्यवस्थेबाबत शिकवू पाहतायत. काँग्रेसने ओबीसींना आरक्षणही नीट दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न देण्यास योग्य नाहीत असं ज्यांना वाटत होतं आणि ज्यांनी आपल्याच कुटुंबातल्या लोकांना भारतरत्न आणि इतर राष्ट्रीय पुरस्कार दिले. आता तेच लोक आम्हाला उपदेश देत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या राज्यसभेतील भाषणावर प्रतिक्रिया देताना नामोल्लेख टाळत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा चालू आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, मी त्या दिवशी राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचं भाषण खूप लक्ष देऊन ऐकलं. ते भाषण ऐकून मला खूप आनंद झाला. कारण असं मनोरंजन नेहमी पाहायला मिळत नाही. लोकसभेत अधून मधून असं मनोरंजन पाहायला मिळतं, परंतु, हल्ली ते दुसऱ्या ड्युटीवर आहेत. त्यामुळे हल्ली लोकसभेत मनोरंजन कमी होतं. परंतु, लोकसभेतील मनोरंजनाची कमी तुम्ही पूर्ण केलीत. पंतप्रधान म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे त्या दिवशी शांतपणे त्यांचं भाषण करत होते. खूप वेळ बोलत होते. मी विचार करत होतो, हे आज इतकं कसं काय बोलू लागले. यांना बोलण्याचं इतकं स्वातंत्र्य कसं काय मिळालं? नंतर माझ्या लक्षात आलं की सभागृहात दोन स्पेशल कमांडो असतात ते कमांडो त्या दिवशी सभागृहात नव्हते. खरगेंनी त्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला. हे ही वाचा >> “काँग्रेसची विचारधारा ‘आऊटडेटेड’, इतक्या मोठ्या पक्षाचं अधःपतन..”; राज्यसभेत मोदींची टोलेबाजी नरेंद्र मोदी म्हणाले, मला वाटतं खरगेंनी त्या दिवशी सिनेमाचं एक गाणं ऐकलं असेल, 'ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा' हे गाणं ऐकून ते सभागृहात आले असतील. दोन्ही कमांडो नसल्यामुळे खरगे त्यांच्या भाषणात चौकार-षटकार लगावत होते. त्यांना खेळायला मजा आली असेल. भाषणाच्या शेवटी त्यांनी आम्हाला लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचा आशीर्वाद दिला. त्यांचा आशीर्वाद शिरसावंद्य.