स्थानिक जनतेने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
‘टाडा दलम’ या नावाने बंडखोरांनी वितरित केलेली ही पत्रके जिल्ह्य़ातील रूपझर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवारबेली, सोनगुड्डा आणि मछ्छुर्डा या ग्रामीण भागात भिंतींवर चिकटवण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
आदिवासींचे शोषण करणाऱ्या, तसेच अवैध खाणकामाला व भांडवलशाहीला उत्तेजन देणाऱ्या सरकारचा निषेध करतानाच, लोकांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन या पत्रकांमध्ये करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक गौरव तिवारी यांनी दिली. बुधवारी ही पत्रके हस्तगत करण्यात आल्यानंतर रात्रीच पोलिसांनी सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.