Nirav Modi Extradition: पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील उच्च न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला असून त्यानुसार तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तास होणार आहे. पीटीआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी लंडन कोर्टात भारताकडून सातत्याने बाजू मांडली जात होती. याविरोधात नीरव मोदीनं लंडन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खरंतर फेब्रुवारी महिन्यातच नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं निर्णय दिला होता. तेव्हापासून नीरव मोदी वँड्सवर्थ तुरुंगात होता. मात्र, त्याने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लंडन कोर्टात केली होती. आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचा दावा ५१ वर्षीय मोदीनं याचिकेत केला होता. त्याच आधारावर आपल्याला भारतात पाठवू नये, अशी मागणी त्यानं केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा!

भारतात नीरव मोदीवर तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांचा नीरव मोदीच्या ताब्यातील कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता. यासोबतच, पुरावे गायब करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे असे गुन्हेदेखील सीबीआयनं नीरव मोदीवर दाखल केले आहेत.