नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू यांनी बुधवारी म्हणजेच आज भाजपाला राम राम केला आहे. भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आणि त्यांचा दृष्टीकोन यांचा योग्यप्रकारे प्रचार केला नाही. मला त्याविषयीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र ते पूर्ण झालं नाही त्यामुळे मी आता भाजपा सोडतो आहे असं चंद्र बोस यांनी जाहीर केलं. चंद्र बोस यांनी २०१६ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपाला राम राम केला आहे. २०१६ मध्ये चंद्र बोस यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं आणि २०१९ मध्ये चंद्र बोस यांनी खासदारकीची म्हणजेच लोकसभेची निवडणूक भाजपाच्या तिकीटावर लढवली होती.

काय म्हणाले चंद्र बोस?

“मला हे आश्वासन देण्यात आलं होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारधारेचा प्रचार केला जाईल. तसंच मलाही तो प्रचार करण्याची पूर्ण मुभा असेल. मात्र असं काहीही घडलं नाही. मला नेताजींची विचारधारा भाजपाच्या मंचावरुन देशभरात न्यायची होती. मात्र ते न घडल्याने मी आज पक्ष सोडतो आहे.” असं चंद्र बोस यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांची सोडचिठ्ठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लिहिली आहे.

राजीनाम्यात काय म्हटलं आहे चंद्र बोस यांनी?

कुठलाही धर्म, जात आणि पंथाच्या लोकांना ‘भारतीय’ या एका निकषावर एकजूट करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा मला प्रचार करायचा होता. भाजपामध्ये आल्यानंतर या विचारांच्या प्रचारासाठी आझाद हिंद मोर्चा तयार करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या परिने संपूर्ण प्रयत्न करत होतो. मात्र माझ्या प्रयत्नांना पश्चिम बंगालमध्ये भाजपाने कुठलाही पाठिंबा दिला नाही.

(

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्र बोस यांनी हे म्हटलं आहे की माझ्या प्रयत्नांना भाजपाने कुठलाही पाठिंबा दिलेला नाही. बंगालच्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मी एक विशिष्ट रणनीती आखली होती. त्यासाठी एक विस्तृत प्रस्तावही ठेवला होता मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आज मी पक्षाचा राजीनामा देतो आहे.